जो डाव अभिजीत टाकणार होता, तोच बालाने टाकला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

जालना: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील बाला रफिक शेखने बाजी मारली. मातीचं मैदान गाजवणाऱ्या बाला रफिक शेखने अंतिम लढतीत मॅटचा सम्राट आणि गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेवर 11-3 अशी मात केली आणि मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात गतवर्षीचा ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजीत कटकेने […]

जो डाव अभिजीत टाकणार होता, तोच बालाने टाकला!
Follow us on

जालना: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील बाला रफिक शेखने बाजी मारली. मातीचं मैदान गाजवणाऱ्या बाला रफिक शेखने अंतिम लढतीत मॅटचा सम्राट आणि गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेवर 11-3 अशी मात केली आणि मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात गतवर्षीचा ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजीत कटकेने रवींद्र शेंडगेवर मात करत फायनल गाठली. पुण्याच्या शिवराम दादा तालमीत, परदेशी कोचच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत त्यानं फायनलपर्यंत मजल मारली.

दुसरीकडे माती विभागातून बाला रफिक शेखने महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या फायनलमध्ये धडक दिली. सुरुवातीच्या सामन्यापासून आक्रमक खेळ करत, अनेक नामवंत मल्लांना नमवत, माती विभागातून महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी त्याने फायनलमध्ये प्रवेश केला.

पुण्याचा अभिजीत कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख या दोन मल्लांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व कुस्ती रसिकांच्या नजरा लागल्या होत्या.

आक्रमक अभिजीत

बलदंड अभिजीत कटके हा आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. अभिजीतने महाराष्ट्र केसरीच नव्हे तर हिंदकेसरी आणि ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्या दृष्टीने तयारी केली आहे. यूट्यूबवर पैलवानांचे व्हिडीओ पाहून, त्यांचे डाव उलथवून लावणं हे अभिजीतचं कौशल्य आहे. गेल्या वर्षी किरण भगतवर मात करत अभिजीत महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता. मात्र यंदा त्याला बाला रफिक शेखने रोखलं, त्याच्याशी झुंज दिली आणि विजयही मिळवून महाराष्ट्र केसरीचा किताब हिसकावला.

बालाने अभिजीतचा डाव टाकला

अभिजीत हा आक्रमक खेळासाठी ओळखला जातो, त्याप्रमाणे मैदानात समोरच्या पैलवानावर तो अक्षरश: तुटून पडतो. पहिल्या फेरीत आक्रमक खेळ करुन गुण मिळवायचे आणि नंतरच्या फेरीत बचाव करायचा यामध्ये अभिजीतचा हातखंडा आहे. त्याची झलक कालच्या सामन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळाली. अभिजीतने पहिल्या काही सेकंदातच बाला रफिक शेखचा एक पाय पकडून, त्याला फरफटत मैदानाबाहेर फेकलं. बाला रफिक शेख मैदानाबाहेर प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. त्याचक्षणी अभिजीत आपला जोश कायम राखणार हे दिसून आलं.

मात्र बाला रफिक शेख मैदानात परतला तो जखमी वाघाप्रमाणेच. आल्या आल्या बालाने अभिजीतवर आक्रमक डावपेच सुरु केले. जे डाव अभिजीत टाकणार होता, तेच डाव बालाने टाकले. अभिजीतचा आक्रमकपणा बालाने घेतला आणि एकावर एक गुण मिळवत गेला. बालाने इतके गुण मिळवले, की अभिजीतला त्याच्या जवळपासही जाता आलं नाही. सामन्याच्या शेवटची शिट्टी वाजली आणि बाला रफिक शेखने तब्बल 11-3 अशा गुणांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.

संबंधित बातम्या 

पैलवानांना दिली जाणारी गदा खरंच चांदीची असते का? 

‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी बाला रफिक शेख कोण आहे? जाणून घ्या  

बाला रफीक शेख यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’