25 षटकार आणि 15 चौकार! अभिषेक शर्माकडून तोडफोड, वनडेत द्विशतकी खेळीसह फॉर्म परतला
Abhishek Sharma Double Hundred: भारताचा स्टार फलंदाज अभिषेख शर्मा गेल्या काही सामन्यात फेल गेला. त्यामुळे त्याचं संघातील स्थान अडचणीत आलं आहे. असं असताना त्याने आपल्या द्विशतकी कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशन दरवर्षी आंतर-जिल्हा वरिष्ठ वन-डे स्पर्धेचं आयोजन करते. या स्पर्धेत अमृतसर विरुद्ध तरन तारन हे संघ आमनेसामने आले होते. अमृतसर संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माचं वादळ या स्पर्धेत घोंघावलं. अमृतसरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 533 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तरन तारन संघ 50 षटकांत 8 बाद 313 धावाच करू शकला. हा सामना अमृतसरने २२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अभिषेक शर्माने या सामन्यात अवघ्या 91 चेंडूत 233 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 25 उत्तुंग षटकार आणि 15 चौकार मारले. चौकार आणि षटकारांची गोळाबेरीज केलीतर 210 धावा त्याने केवळ बाउंड्रीजच्या मदतीने केल्या. इतकंच काय तर फलंदाजीनंतर अभिषेकने गोलंदाजीतही चमक दाखवत 9 षटकांत 71 धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याचा फॉर्म परतल्याचे संकेत मिळत आहेत.
अभिषेक शर्माला सूर गवसला का?
अभिषेक शर्माचं भारतीय संघातील स्थान डळमळीत झालं आहे. गेल्या काही सामन्यांपासून त्याची बॅट शांत आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात यावं अशी काही क्रीडातज्ज्ञ मागणी करत आहेत. मागच्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तर त्याला दुहेरी धावही गाठता आली नव्हती. तीन डावात त्याने 1, 8 आणि 2 धावा केल्या होत्या. पण आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी खेळीमुळे त्याने फॉर्मात परतल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढच्या मालिकेत निवड करताना निवडकर्त्यांना कारण देता येईल. इतकंच वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी त्याच्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दावा!
अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त टी20 फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्यामुळे इतर फॉर्मेटसाठी त्याचा विचारही केला जात नाही. पण आता त्याने वनडे क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघात एक आक्रमक पर्याय उपलब्ध होणार आहे. 50 षटकांच्या खेळात अभिषेक आपली छाप सोडू शकतो, तसेच संघाला आक्रमक सुरूवात करून देऊ शकतो असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. इतकंच काय तर गोलंदाजीतही आपली छाप सोडू शकतो. त्यामुळे निवडकर्ते त्याचा विचार करू शकतात.