
रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने काल वेस्ट इंडिजवर विजय मिळवून दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 195 धावांचा विशाल डोंगर उभारला. टीम इंडियाने 19.2 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. एकवेळ हे लक्ष्य कठीण वाटत होतं. पण संजू सॅमसनच्या 50 चेंडूतील नाबाद 97 धावांच्या झुंजार खेळीमुळे टीम इंडियाने हे अवघड लक्ष्य पार केलं. संजूच्या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत विजय मिळेपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून राहिला. त्यानेच चौकार मारुन विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयी फटका मारल्यानंतर संजू मैदानातच गुडघ्यावर बसला व त्याने आकाशाकडे पाहिलं. या खेळीबद्दल त्यावे दैवी शक्तीचे आभार मानले.
“हा खूप खास क्षण आहे. मी मानतो आणि मला हा क्षण प्रायवेट ठेवायचा आहे. माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे” असं संजू सॅमसन जियो हॉटस्टारवर पार्थिव पटेलशी बोलताना म्हणाला. ईडन गार्डन्सवर भारताला त्याच्या खेळीमुळेच विजय साकारता आला. संजूच्या विजयी फटक्यानंतर मैदानात लगेच सेलिब्रेशन सुरु झालं. त्याकडे सगळ्यांच लक्ष वेधलं गेलं. संजूनेही मैदानातील त्याच्या कृतीवर स्पष्टीकरण देणं टाळलं. धावसंख्या चेस करताना फक्त आक्रमकतेशिवाय संयम, स्पष्टता आणि जबाबदारी आवश्यक होती.
काही ओव्हर्समध्ये गेम संपवायचा असतो
“मला वाटतं थोडं कठीण होतं. आमची बॅटिंग पावर लक्षात घेता, इडन गार्डन्सवर 190 ही चेस होण्यासारखी धावसंख्या आहे. दव पडल्यानंतर अजून थोडं सोपं झालं. पण ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने थोडं आव्हानात्मक होतं” असं संजू सॅमसन म्हणाला. “मला चांगली सुरुवात मिळाली. चांगल्या सुरुवातीनंतर मला गेमवर वर्चस्व गाजवून मला काही ओव्हर्समध्ये गेम संपवायचा असतो. पण ज्यावेळी विकेट पडत होत्या, मला वाटलं की, मलाच हा गेम फिनिश करायचा आहे. मला शेवटपर्यंत मॅच घेऊन जायची होती आणि तसचं झालं” असं संजू सॅमसन म्हणाला.
त्यावेळी तुम्ही दुसरा पर्याय शोधला पाहिजे
“तुम्ही जेव्हा पहिली फलंदाजी करता, त्यावेळी मोठी धावसंख्या उभारण्याचा तुमचा प्रयत्न असतो. मी जास्तीत जास्त सिक्स मारण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या सामन्यात दबाव असतो, प्रेशर गेम असतो, त्यावेळी तुम्ही दुसरा पर्याय शोधला पाहिजे. तुम्ही जास्त चौकार मारले पाहिजेत. जास्त धोका पत्करला पाहिजे” असं संजू सॅमसन म्हणाला.