धोनीची माघार, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, या दोन नव्या खेळाडूंना संधी मिळणार?

| Updated on: Jul 20, 2019 | 6:26 PM

यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर कसोटी संघासाठी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) फिटनेसबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विंडीज दौऱ्यात (Team India for West Indies Tour) काही नव्या खेळाडूंचीही एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धोनीची माघार, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, या दोन नव्या खेळाडूंना संधी मिळणार?
Follow us on

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team India for West Indies Tour) घोषणा रविवारी होणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समिती वानखेडे स्टेडिअममध्ये दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या (MS Dhoni) जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर कसोटी संघासाठी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) फिटनेसबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विंडीज दौऱ्यात (Team India for West Indies Tour) काही नव्या खेळाडूंचीही एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहली विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेईल, असा अंदाज होता. पण आपण दौऱ्यावर जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. तर धोनीच्या जागी रिषभ पंतचं स्थान पक्क मानलं जात आहे. त्याच्यासोबतच युवा खेळाडू संजू सॅमसनलाही संधी दिली जाऊ शकते. यापूर्वीही संजू सॅमसनची निवड झाली होती. पण तो फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ न शकल्याने त्याला दौऱ्याला मुकावं लागलं होतं. या दौऱ्यात कुणाला संधी दिली जाते, त्याकडे लक्ष लागलंय. यासोबतच इशान किशनलाही यष्टीरक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते.

यावेळी संघात मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. विश्वचषकात शानदार कामगिरी करणारे गोलंदाज जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना आराम दिला जाऊ शकतो. या तीन प्रमुख गोलंदाजांना आराम दिल्यानंतर यंग टॅलेंटचा वापर करण्याची संधी मिळेल. यामध्ये नवदीप सैनीचं नाव अग्रक्रमाने येतं. कारण, विश्वचषकात त्याला स्टँडबायलाही ठेवण्यात आलं होतं. शिवाय खलील अहमद, आवेश खान, दीपक चहर यांनाही विंडीजचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

सलामीची जोडी कोण?

मयांक अग्रवालचा भारतीय वन डे आणि टी-20 संघात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज ठरलेला रोहित शर्माला या दौऱ्यातून आराम दिला जातो की नाही तेही महत्त्वाचं असेल. शिखर धवनच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या शुबमन गिलचं स्थानही पक्क मानलं जातंय. दुसरीकडे केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांची सुट्टी केली जाणं निश्चित आहे. तर विजय शंकरही अजून दुखापतीतून सावरलेला नसल्याची माहिती आहे.

कसोटी संघातही फेरबदल?

कसोटी संघात सर्व प्रमुख फलंदाज पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळलेलाच संघ पुन्हा एकदा दिसू शकतो. सलामीवीर पृथ्वी शॉबाबत सस्पेन्स कायम आहे. कारण, तो दुखापतग्रस्त असल्याचं बोललं जातंय. कसोटी मालिकेपर्यंत पृथ्वी शॉ फिट झाल्यास त्याची निवड निश्चित मानली जाते. सलामीसाठी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांना उतरवलं जाऊ शकतं.

पृथ्वी शॉ फिट न झाल्यास तिसरा सलामीवीर फलंदाज म्हणून कुणाला संधी द्यायची याबाबत निवड समितीची डोकेदुखी होऊ शकते. या परिस्थितीत मुरली विजयला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.