पंड्या आणि केएल राहुलवरील निलंबन मागे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नवी दिल्ली: बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलवरील निलंबन मागे घेतले आहे. महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी या दोन्ही खेळांडूंना बीसीसीआयकडून निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुनही माघारी परतावं लागलं होतं. इतकंच नाही तर त्यांना न्यूझीलंड दौऱ्यातूनही वगळलं होतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आता बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हार्दिक पंड्या आणि केएल […]

पंड्या आणि केएल राहुलवरील निलंबन मागे
Follow us on

नवी दिल्ली: बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलवरील निलंबन मागे घेतले आहे. महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी या दोन्ही खेळांडूंना बीसीसीआयकडून निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुनही माघारी परतावं लागलं होतं. इतकंच नाही तर त्यांना न्यूझीलंड दौऱ्यातूनही वगळलं होतं.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आता बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हार्दिक पंड्या आणि केएल राहुलवरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळता येणार आहे. मात्र यांच्यावरील चौकशी प्रलंबित राहाणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पंड्या आणि केएल राहुल हे 2019 च्या विश्वचषकात खेळू शकतील.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ मध्ये पंड्या आणि के एल राहुलला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद रॉय यांनी केली होती. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करत त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण वन डे मालिकेतून वगळलं होतं, शिवाय त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही खेळता आले नाही. तसेच ते  क्रिकेट विश्वचषक 2019 मधूनही वगळले जाण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेट प्रशासक समितीने त्यांच्यावरील निलंबन मागे घेतल्याने ते विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे.

करण जोहरची पहिली प्रतिक्रिया

दिग्दर्शक करण जोहर हा ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करतो. हार्दिक आणि के एल राहुलला करणनेच या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या खासगी जीवनाविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. करणने हार्दिक आणि केएल राहुललाही असेच खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले. त्यावर हार्दिकने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आणि हे दोन्ही खेळाडू वादात अडकले. या संपूर्ण वादावर करण जोहरने आता स्पष्टीकरण देत याप्रकरणी हार्दिक आणि के एल राहुलप्रमाणे आपणही जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

“कॉफी विथ करण हा माझा कार्यक्रम आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाला मी माझी जबाबदारी मानतो. यासाठी मी जबाबदार आहे. मी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला माझ्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. त्यामुळे त्या दोघांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही माझी जबाबदारी होती, याचा विचार करुन मी अनेक दिवसांपासून झोपलेलो नाही. हे प्रकरण कसं सावरावं हे मला कळत नाही, कारण हे माझ्या हाताच्या बाहेर गेलं आहे. आता माझं म्हणणं कोण ऐकणार”, असे सांगत करण जोहरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय आहे प्रकरण?

हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे  दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात  सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’

पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचं सांगितलं गेलं. पंड्याच्या या वक्तव्याला महिला विरोधी आणि सेक्सिस्ट म्हटले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली. यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली होती. तर प्रशासक समितीच्या सदस्या डायना एल्डुजी यांनी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला पुढील कारवाईपर्यंत निलंबित करण्याची शिफारस केली होती.

पंड्या आणि राहुलला बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. ज्यावर त्या दोघांनीही जे काही झाले, त्यावर माफी मागितली होती.