CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

दिल्लीत जंतरमंतरवर नीट पेपर फुटी संदर्भात आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले कारण पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आता या प्रकरणावर अनेकांनी भाष्य केलेले पाहायला मिळते. आता यातच युवराज सिंगनेही याबद्दल आपले मत मांडले आहे.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला... युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
| Updated on: Jul 23, 2026 | 10:35 AM

कॉकरोच जनता पार्टी नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण होते, परंतु 20 जुलै 2026  पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. ज्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. यावर आता अनेकांनी आवाज उठवला आहे. यावर अनेकांनी आपले मत मांडले आहे, अनेक सेलिब्रिटींनी आपला याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटी तर दिल्लीला पोहोचून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन आपला पाठिंबा दर्शवला आहे. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

युवराजने आपल्या इंस्टाग्रामवर आंदोलनाबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला, स्त्रीला आणि पुरुषाला शांततेने शिकण्याची, सुरक्षितपणे वाढण्याची आणि आपली स्वप्ने साकार करण्याची संधी मिळाली पाहिजे. तुमचे कल्याण हाच एका उत्तम भारताचा पाया आहे. चला, आपण सर्वजण मिळून काळजी, संधी आणि आशेचा समाज घडवण्यासाठी काम करूया. भारताच्या भविष्यासाठी संवादाच्या माध्यमातून आपण या प्रश्नावर सामंजस्यपूर्ण तोडगा काढू शकतो.”

सीजेपीचा ‘संसद चलो’ मोर्चा
20 जुलै 2026 रोजी, सीजेपीने दिल्लीत ‘संसद चलो’ मोर्चा आयोजित केला. यादरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. विरोधी नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या नळकांड्याचा वापर केल्याचा आरोप केला. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संसदेतही गोंधळ
नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात कोंडी कायम आहे. विरोधी पक्ष चर्चेसाठी विशेष नियमांची मागणी करत आहे, तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेक वेळा स्थिगत करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला, त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र, नंतर दिल्ली पोलिसांनी त्यांची सुटका केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us