भारताला 5G ची स्वप्न, पण 4G स्पीडमध्येही बफरिंग, वेग मंदावलेलाच

| Updated on: Jun 14, 2019 | 8:44 PM

अनेक भागात हायस्पीड इंटरनेट असूनही बफरिंगचा सामना करावा लागतो. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण यासाठी सरासरी जास्त पैसे मोजतो.

भारताला 5G ची स्वप्न, पण 4G स्पीडमध्येही बफरिंग, वेग मंदावलेलाच
Follow us on

मुंबई : मोदी सरकार लवकरच 5G स्पीड इंटरनेट देण्याच्या तयारीला लागलं आहे. सध्या आपण वापरत असलेल्या 4G आणि 3G पेक्षा हे किती तरी हायस्पीड असेल, असा दावा केला जातोय. पण भारतात सध्या 4G इंटरनेटचं चित्र काही वेगळंच आहे. अनेक भागात हायस्पीड इंटरनेट असूनही बफरिंगचा सामना करावा लागतो. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण यासाठी सरासरी जास्त पैसे मोजतो.

5G म्हणजेच पाचव्या पीढीचं मोबाईल नेटवर्क टेक्नॉलॉजी यामुळे स्पीड चांगलं मिळणार आहे. 4G पेक्षा 100 पटीने इंटरनेटचा स्पीड असेल असंही बोललं जातं. शिवाय वेगाने ब्रॉडबँड सेवाही मिळेल. स्मार्ट ड्रायव्हिंग, स्मार्ट टीव्ही, रिमोट सर्जरी सारख्या सेवा सुलभ होतील.  हे ऐकूण आपल्याला चांगलं वाटलं असेल, पण पूर्वीचा इतिहास वेगळंच सांगतो. मोबाईलचा जागतिक इंटरनेट स्पीडचा जर विचार केला तर डाऊनलोडसाठी 26.96 MBPS आहे आणि अपलोडचा स्पीड 10.40 MBPS आहे.

4G स्पीडमध्ये भारताचा क्रमांक

ग्लोबल इंडेक्सनुसार 138 देशांचा समावेश आहे. त्यात भारताचा 121 वा क्रमांक आहे. भारतात इंटरनेटचा स्पीड आहे 10.71 MBPS. पहिल्या क्रमांकावर नॉर्वे असून नॉर्वेचं इंटरनेट स्पीड 65.41 MBPS आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा असून स्पीड 64.42 MBPS आहे. तिसऱ्या क्रमांरावर दक्षिण कोरिया असून स्पीड 63.81 MBPS आहे. नेदरलँडचा क्रमांक चौथा आहे, तर स्पीड 61.75 MBPS आहे. पाचव्या क्रमांकावर कतार असून स्पीड 59.90 MBPS आहे.

5G चं स्वप्न आपण रंगवतोय…त्यात भारतात 4G चा इंटरनेट सरासरी स्पीड 10.71 MBPS आहे.

3G स्पीड

महाराष्ट्रात 3G चा AIRTELचा स्पीड 3.1 MBPS,  BSNL चा 3.2,  VODAFONE चं स्पीड 2.1 MBPS, IDEA चं स्पीड 1.9 MBPS आहे.

भारत सर्वात स्वस्त इंटरनेटचा दावा तर करतोच..त्यात सत्यताही आहे. 1GB इंटरनेट भारतात 18.50 रुपयांना मिळतं. मात्र स्वस्त मिळतं म्हणून स्पीडही तितकाच खराब मिळतो, हेही सत्य आहे. मात्र इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांची पैशांची उलाढालही जोरात सुरु आहे. भारतात 100 कोटींहून अधिक मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या आहे. तर इंटरनेट वापणाऱ्यांचा आकडा 62 कोटी 70 लाख आहे. त्यातच 3G आणि 4G सेवा देण्यातच कंपन्यांचा अधिक फायदा आहे.

म्हणजेच कोट्यावधी रुपयांची उलाढाल भारतात रोज होते आणि स्पीडच्या नावावर बोंब आहे. त्यामुळेच सवालही अनेक निर्माण होतात.  फक्त नावालाच 3G आणि 4G आहे का?  पैसे 4G चे मग स्पीड 3G एवढाही का नाही? दररोज जनतेची लूट सुरु नाही का? सरकार स्पेक्ट्रमचा लिलाव करुन मोकळं होणार का? इंटरनेटच्या स्पीडवर कोण लक्ष देणार? हे अनुत्तरित प्रश्न आहेत. इंटरनेट लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. लोक त्यासाठी पैसाही मोजतात. पण वास्तव धक्कादायक आहे. आता 5G ची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे पाचव्या पिढीचं इंटरनेट मिळावं हीच अपेक्षा आहे.