60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला

9 वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या जोडप्याने नोव्हेंबरमध्ये केलं लग्न. पण लग्नाच्या 60 दिवसानंतर नवऱ्याने केलं असं काही पत्नीने केला नवऱ्याचा खून. नेमकं काय घडलं?

60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 03, 2026 | 5:11 PM

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली असून या घटनेने प्रेम, विश्वास आणि वैवाहिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तब्बल 9 वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या पत्नीने लग्नानंतर केवळ 60 दिवसांतच आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या खूनप्रकरणात पत्नीला तिच्या आई-वडिलांचा आणि भावाचाही पाठिंबा असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

ही घटना इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जितेंद्र कुमार यादव आणि ज्योती यांच्यात गेल्या 9 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या संमतीने दोघांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या थाटामाटात विवाह केला होता. मात्र हे सुख फार काळ टिकू शकलं नाही.

ऑनलाइन जुगाराची सवय ठरली वादाचं मूळ

लग्नानंतर काही दिवसांतच जितेंद्रला ऑनलाइन जुगाराचं व्यसन लागलं. या व्यसनामुळे घरात वादाला सुरुवात झाली. आरोपानुसार, जितेंद्रने ज्योतीच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढून जुगारात उडवले. यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं सुरू झाली. 26 जानेवारी रोजी पैशांच्या वादातून घरात भीषण भांडण झालं. या भांडणानंतर ज्योतीने आपल्या माहेरच्यांना फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली.

आरोपांनुसार, ज्योतीचे आई-वडील घरात पोहोचताच वादाने हिंसक वळण घेतलं. उपलब्ध पुराव्यांनुसार, ज्योतीच्या आई-वडिलांनी जितेंद्रचे हात-पाय घट्ट पकडले तर संतापाच्या भरात ज्योतीने स्वतः आपल्या पतीचा गळा आवळून त्याचा खून केला. इतक्यावरच न थांबता या घटनेला आत्महत्येचं स्वरूप देण्यासाठी आरोपींनी धक्कादायक कट रचला. जितेंद्रच्याच मफलरने त्याचा मृतदेह घरातील वेंटिलेटरच्या ग्रिलला लटकवण्यात आला आणि जावयाने गळफास घेतला असा आरडाओरडा करण्यात आला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य समोर

सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे आत्महत्येच्या दृष्टीने पाहिलं. मात्र पोस्टमॉर्टम अहवालाने संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. अहवालात स्पष्ट झालं की जितेंद्रचा मृत्यू गळफासामुळे नाही तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. चौकशीत एकामागोमाग एक धागे जुळत गेले आणि अखेर खून असल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणाबाबत माहिती देताना सीओ सिटी थर्ड पंकज श्रीवास्तव यांनी सांगितलं की, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी पत्नी ज्योती, सासरे कालीचरण आणि सासू चमेली यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. दरम्यान, या खूनप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेला ज्योतीचा भाऊ सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.