नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या “या” नियमांमागचे कारण काय?

हे गाव आधुनिकतेसोबतच श्रद्धा आणि परंपरेशी घट्टपणे जोडलेलं आहे. गावात असे काही नियम आहेत, ज्यांचे पालन न केल्यास संकट ओढावते, अशी स्थानिकांची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर डोली गावाची ही अनोखी गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे.

नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या या नियमांमागचे कारण काय?
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 3:52 PM

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरीही जोधपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेलं डोली गाव आजही श्रद्धा आणि संताच्या वचनांवर चालतं. जोधपूर-बाडमेर महामार्गालगत वसलेलं हे गाव आपल्या आगळ्या परंपरांसाठी ओळखलं जातं.

200 वर्षांची संत परंपरा आजही जपली जाते : गावात आजही काही ठराविक नियम काटेकोरपणे पाळले जातात. येथे कोणीही दोन मजली घरं बांधत नाही, सोनार रात्री गावात थांबत नाहीत आणि गावात कुठेही तेल काढण्यासाठी घाणी चालवल्या जात नाहीत. हे नियम केवळ सामाजिक शिस्तीमुळे नव्हे, तर संत हरिराम बैरागी यांच्या वचनांमुळे आजवर कायम आहेत.

खेजडीचे झाड : गावकऱ्यांच्या मते, दोन शतके पूर्वी बैरागी महाराजांनी येथे तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या वेळी त्यांनी जमिनीत सुकलेल्या लाकडाची एक काठी रोवली होती. आज त्या ठिकाणी उभं असलेलं खेजडीचं मोठं झाड या घटनेची साक्ष आहे. बैरागी महाराजांनी गावकऱ्यांना सांगितलं होतं की, गावाच्या चारही दिशांनी कच्च्या दूध आणि सुक्या नारळाच्या ज्योतांनी आरती करून संरक्षण तयार करा. त्यानंतर गावात कधीच कोणतंही मोठं संकट आलं नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

राजामहाराजांच्या काळात, कविराज मुरारीलाल चारण यांना जोधपूरच्या राजाकडून 12 गावे देण्यात आली होती, त्यामध्ये डोली गावाचाही समावेश होता. मुरारीलाल यांनी बैरागी महाराजांना गावात करणी मातेचं मंदिर बांधण्याची विनंती केली होती, जी पूर्ण झाली. या मंदिरामुळे गावातील धार्मिक आस्था आणखी दृढ झाली.

गावकऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी दोन मजली घरं बांधून परंपरेचा भंग केला होता. मात्र, त्यांना त्यात राहताच आलं नाही. कोणाला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, कोणाच्या कुटुंबात अचानक मृत्यू झाले, तर काही जण गंभीर आजारांनी त्रस्त झाले. या घटनांमुळे गावकरी अधिकच सतर्क झाले आणि परंपरेचं पालन अधिक निष्ठेने करू लागले.

आजही डोली गाव विज्ञानाच्या युगातही श्रद्धा, परंपरा आणि संतांच्या वचनांवर आधारित जीवनशैली जपतो आहे. हे गाव म्हणजे आध्यात्म, सामाजिक शिस्त आणि लोकसहभागाचं अद्वितीय उदाहरण ठरतंय.