
भारतीय रेल्वे ही केवळ देशाची जीवनवाहिनी नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेच्या सेवांचा लाभ घेतात.

आधुनिक तंत्रज्ञान, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक ट्रेन, अमृत भारत स्टेशन योजना आणि डिजिटल तिकीट प्रणालीमुळे भारतीय रेल्वे दिवसेंदिवस अधिक सक्षम होत चालली आहे.

मात्र, अशातच काही अशी रेल्वे स्थानके आहेत, जी आपल्याला जुन्या काळातील रेल्वे संस्कृतीची आठवण करून देतात. अशाच एका अनोख्या रेल्वे स्टेशनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न किंवा शिटी अजिबात वाजत नाही.

भारतामध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे. वर्धमान शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे स्टेशन अत्यंत लहान असून येथे अनेक रेल्वे थांबत नाही.

विशेष बाब म्हणजे या स्टेशनवर फक्त बांकुडा–मासाग्राम पॅसेंजर थांबते. मात्र, रविवारी ही ट्रेन नसल्याने येथे कोणीच येत नाही. त्यामुळे संपूर्ण स्टेशन परिसरात पूर्ण शांतता असते. ना रेल्वेचा हॉर्न, ना उद्घोषणा, ना प्रवाशांची गर्दी. एकदम शांतता येथे अनुभवायला मिळते.

आणखी एक गोष्ट म्हणजे रविवारी हे स्टेशन पूर्णपणे बंद असते. रिपोर्ट्सनुसार, रविवारी स्टेशन मास्टरला तिकीट खरेदीसाठी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी वर्धमान शहरात जावे लागते. त्यामुळे या दिवशी तिकीट काउंटर बंद असतो. कोणतीही रेल्वे सेवा उपलब्ध नसते. स्टेशनवर कर्मचारी उपस्थित नसतात. याच कारणामुळे रविवारी येथे रेल्वेचा हॉर्न वाजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.