Post Office Scheme : या योजनेत जास्त फायदा, आता लवकर होईल डबल पैसा !

| Updated on: Feb 15, 2023 | 8:26 AM

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना कमालीच्या लोकप्रिय आहेत. अनेकांना या योजनांमध्ये दामदुप्पट फायदा झाला आहे. अनेक गुंतवणूकदारांना पोस्टाच्या योजनांची भुरळ पडलेली आहे. या योजनेत आता ग्राहकांना लवकरच दामदुप्पट रक्कम मिळते.

Post Office Scheme : या योजनेत जास्त फायदा, आता लवकर होईल डबल पैसा !
Follow us on

नवी दिल्ली : पैसे डबल होणे कोणाला आवडत नाही. जर तुम्ही गुंतवणुकीचा योजना आखत असाल आणि जोखीममुक्त बचत (Saving Scheme) करण्यावर भर देत असाल तर बाजारात अनेक योजना आहेत. त्यात पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक (Post Office Investment) आजही लोकप्रिय आहे. परंपरागतच नाही तर शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनाही या योजनेची भुरळ पडली आहे. टपाल खात्याच्या या योजनेत अवघ्या 123 महिन्यांत रक्कम डबल होते. व्याजदारच्या (Interest Rate) बळावर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना जोरदार परतावा मिळतो. अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार डोळे झाकून या योजनेत गुंतवणूक करत आहेत.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत व्याज दरे 1.10% पर्यंत वाढविण्यात आली आहेत. किसान विकास पत्राच्या (Kisan Vikas Patra – KVP) व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे. व्याज दरांच्या वृद्धीनंतर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूकदारांची रक्कम आता 3 महिन्यांअगोदरच दुप्पट होते. त्यामुळे या योजनेत गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

1 जानेवारी 2023 रोजीनंतर किसान विकास पत्रात आता तुमचा पैसा 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यातच डबल होतो. म्हणजेच आता पूर्वीपेक्षा गुंतवणूकदारांचे तीन महिने वाचणार आहेत. त्यांना आता डबल परतावा तीन महिन्यांअगोदरच मिळेल. केव्हीपीवर त्यांना सध्या 7.20% व्याज मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

या योजनेत तुम्ही केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतेही मर्यादा नाही. या योजनेतंर्गत तुम्ही किती खाते उघडू शकता. योजनेत तुम्ही एकल अथवा 3 वृद्ध व्यक्ती मिळून संमिश्र खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही कोणाला ही वारस नेमू शकता.

या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.तसेच या योजनेत खाते हस्तांतर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा सह खातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत करता येते. या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.