केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ट्रेनमध्ये मोफत वायफायची योजना बारगळणार?
Indian Railway | हावडा राजधानी एक्स्प्रेसमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर सॅटेलाईटच्या माध्यमातून वायफाय सुविधा पुरवली जात आहे. मात्र, त्यासाठी बराच खर्च येत होता. तसेच इंटरनेटचा स्पीडही फारसा नव्हता.
नवी दिल्ली: कोरोनापूर्व काळात केंद्र सरकारने रेल्वे प्रवाशांना नव्या सुविधा देण्याच्यादृष्टीने अनेक योजना आखल्या होत्या. मात्र, आता कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीतील उत्पन्नाचा ओघ आटला आहे. परिणामी केंद्र सरकारकडून अनेक योजनांना कात्री लावली जात आहे. सध्याच्या घडीला अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जाते. ही सुविधा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही देण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने तुर्तास आपला विचार बदलल्याचे सांगितले जाते.
केंद्र सरकारने नुकतेच संसदेत यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार ट्रेनमध्ये इंटरनेट कनेक्शनचा प्रस्ताव सध्या बाजूला सारण्यात आला आहे. हावडा राजधानी एक्स्प्रेसमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर सॅटेलाईटच्या माध्यमातून वायफाय सुविधा पुरवली जात आहे. मात्र, त्यासाठी बराच खर्च येत होता. तसेच इंटरनेटचा स्पीडही फारसा नव्हता. त्यामुळे ही योजना तुर्तास बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
सध्याची सुविधा काय?
सध्या देशातील मोजक्याच स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जाते. मात्र, हा वायफाय वापरण्यासाठीही मर्यादा आहेत. तुम्ही रेल्वे स्थानकात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला वायफाय वापरण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागते. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येऊन वायफाय सुविधा सुरु होते. ही सेवा 30 मिनिटे सुरु राहते. यापेक्षा जास्तकाळ वायफाय वापरायचा असल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तसेच या वायफायचा स्पीडही फार कमी असतो. सध्याच्या घडीला देशातील सहा हजार रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे.
एका क्लिकवर मिळवा रेल्वेच्या गोदाम आणि लोकेशनची माहिती
संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भारतीय रेल्वेने आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची कमाई केली आहे. यासाठी रेल्वेने आपले संपूर्ण लक्ष या क्षेत्रावर केंद्रित केले.
सध्याच्या घडीला रेल्वेकडून शेतमाल, मासे, दुग्धजन्य पदार्थांची स्वस्तात वाहतूक केली जाते. याशिवाय, धान्य, खाद्यान्न आणि अन्य गोष्टींचीही रेल्वेकडून मोठ्याप्रमाणावर वाहतूक केली जाते. देशभरात मालगाड्यांसाठी विशेष मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या संपूर्ण कारभार ऑनलाईन व्यासपीठावर आणला आहे.
भारतीय रेल्वेच्या www.ecr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर व्यापाऱ्यांना गोदाम, ठिकाण आणि मालवाहतुकीचे इतर सर्व तपशील उपलब्ध करुन दिले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होऊन बुकिंगचे प्रमाण वाढले आहे
संबंधित बातम्या:
Indian Railway Breaking | भारतीय रेल्वेत रात्री 11 ते पहाटे 5 चार्जिंग पॉईट बंद