औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्चा जनतेचा आहे, त्यांचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम भाजपनं केलं. ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम चालला आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी (Water) पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.