अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, कुणी दिलं आव्हान?

'सुप्रिया ताई अब्दुल सत्तार यांच्या दहा पिढ्या विकत घेऊ शकतील... महिला नेत्याने ललकारलं

अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, कुणी दिलं आव्हान?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2022 | 9:04 AM

संजय सरोदे,  जालना – अब्दुल सत्तार (Abdu Sattar) हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथे कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचं बक्षीस देईन, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर (Rekha Taur) यांनी केलंय. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केवळ माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी हे आव्हान दिलंय. त्या म्हणाल्या, अब्दुल सत्तार यांनी जे बेताल वक्तव्य केलंय, त्याचा जाहीर निषेध करते. त्यांनी सुप्रिया ताईंचाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. ते सुप्रियाताईंना भिकारी म्हटले आहेत….
अब्दुल सत्तार, तुला मी सांगू इच्छिते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुला सात पिढ्या विकत घेऊ शकतील. पन्नास खोके, एकदम ओके. शिंदे गटाने पन्नास खोके घेऊन सरकार ओरबाडून आणली आहे….

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की, ते जिथे कुठे दौऱ्यावर असतील, त्याचे कपडे फाडा. जे कुणी कपडे फाडेल, त्याला १० लाख रुपये मी बक्षीस देईन…

ज्यांचं मन दुखावलं त्याची माफी मागतो म्हणाले, पण अब्दुल सत्तार तुझी दिलगिरी आणि माफीही नको. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, महिलांचा अपमान करणाऱ्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा.

काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत असून अशा बेताल वक्तव्यांना आळा बसलाच पाहिजे, अशा आशयाचं पत्र लिहिलं. तसेच अब्दुल सत्तार यांच्या बडतर्फीची मागणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनीदेखील सत्तार यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांनी या वक्तव्यावरून माफीही मागितली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक आक्रमकपणे मांडत आहे.