नागपूर हादरले! एकाच कुटुंबातील पाच जण गायब… शेवटचे लोकेशन कुठे? कर्जाचा डोंगर की दुसरं कारण?
Nagpur Crime News: नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस युद्ध पातळीवर त्यांचा शोध घेत आहे. नातेवाईकांची चिंता वाढली आहे.

Dhantoli Paraswani Family Members Missing: धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ येथून एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहत. २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरातून बाहेर पडल्यानंतर पाचही जण परतले नाहीत. नातेवाईकांना त्यांचा शोध घेतला. पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. हरवल्याची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर धंतोली पोलिसांनी सूत्र हाती घेतली आहे. या सर्वांचे अखेरचे ठिकाण हे पुणे असल्याचे तपासात समोर आले आहे. पण कुटुंबिय त्यांचा संपर्क होत नसल्याने चिंतेत आहेत.
पाच जणे गेले कुठे?
धंतोली परिसरातील ‘दुर्गा सदन’ येथील हर्षा परसवानी (५७), जितेंद्र परसवानी (४२), ईशिता परसवानी (४०), खुशी परसवानी (२१) आणि कृष्णा परसवानी (१२) हे अचानक बेपत्ता झाले. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतरही कोणताही ठावठिकाणा लागला नाही. २९ जून रोजी श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याने नातेवाईकांची काळजी वाढली आहे. या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहितीही समोर येत आहे.
मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात
प्राथमिक तपासात कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपासून हर्षा सुरेश परसवानी, जितेंद्र सुरेश परसवानी, ईशिता जितेंद्र परसवानी, खुशी जितेंद्र परसवानी आणि कृष्णा जितेंद्र परसनावी गायब आहेत. त्यांनी बाहेर जाण्याविषयी कुणालाही काही सांगितले नसल्याचे समजते. त्यांनी ते कधी परत येणार याचीही कुणाला माहिती दिली नव्हती. त्यांचे नातेवाईक सध्या काळजीत आहेत.
कर्जदारांचा तगादा टाळण्यासाठी कुटुंबाने घर सोडल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. बेपत्ता व्यक्तींच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त विनिता साहू यांनी प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले. तांत्रिक तपासासह विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, लवकरच बेपत्ता कुटुंबाचा ठावठिकाणा लागेल, असा पोलिसांना विश्वास आहे.
