ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका

| Updated on: Dec 02, 2021 | 2:12 PM

हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकत असतात. दिसेल त्या पडिक क्षेत्रावर संसार थाटायचा आणि मेंढ्यांचा सांभाळ करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह. सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम. मात्र, नियतीला त्याचे हे कष्टही मान्य नव्हते की काय असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमेन तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात घडला आहे.

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका
वातावरणात गारठा वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात 20 मेंढ्यांचा मृत्यू
Follow us on

अहमदनगर : हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकत असतात. दिसेल त्या पडिक क्षेत्रावर संसार थाटायचा आणि मेंढ्यांचा सांभाळ करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह. सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम. मात्र, नियतीला त्याचे हे कष्टही मान्य नव्हते की काय असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमेन तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात घडला आहे. वातावरणात वाढलेल्या गारठ्यामुळे एका मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत. निसर्गाची अवकृपा बळीराजावर तर यापूर्वीच झाली आहे पण आता शेती व्यवसयाशी निगडीत असलेल्यांवर देखील याचा परिणाम होत आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडलेली आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून आता आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

चारण्यासाठी मेंढपाळाची भटकंती

मेंढपाळांना शेतजमिन नसतेच. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी त्यांची भटकंती ही ठरलेली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील साकुर पठार भागातील मांडवे, शिंदोडी आदी गावातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारणीसाठी पुणे जिल्हयात घेऊन गेले होते. एकदा गेले की पंधरा-पंधरा दिवस मुक्काम हा त्या ठिकाणीच असतो. चारणी करुन गावी परतत असताना हे मेंढपाळ मुक्कामासाठी ते नांदुर खंदरमाळ परिसरात थांबले होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच हवेत वाढलेला गारवा यामध्येच तब्बल 20 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळचे चित्र पाहून मेंढपाळाचा डोक्यालाच हात

गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. असे असतानाही आमचाच संसार उघड्यावर तर तिथे जनावरांची काय सोय. त्यामुळे मेंढ्या ह्या झोपडीबाहेरत बांधलेल्या असल्याचे मेंढपाळाने सांगितले. मात्र, सकाळी उठून पाहिले तर एक नाही दोन नाही तर 20 लहान-मोठ्या मेंढ्या ह्या गारठ्याने मृत्युमूखी पडलेल्या होत्या. त्यामुळे काय करावे याचेही भान राहिले नाही. कोकरं ही आडोशाला होती. मात्र, ते ही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. न भरुन निघणारे नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी या मेंढपाळांनी केलेली आहे.

पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा

शक्यतो थंडीचा परिणाम हा मेंढ्यावर होत नाही पण गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारठा प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी बी.एम खुटाळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळेल अशी आशा मेंढपाळांना आहे.

संबंधित बातम्या :

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त, नुकसानभरपाईच्या मागणीचा जोर

सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?

अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?