अहमदनगर : मध्यंतरी मिरचीचे मुख्य आगार असलेल्या नंदुरबार बाजार समितीमधील व्यवहार हे ठप्प होते. त्याला कारणही तसेच होते. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मिरचीच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यवहार बंद होते पण (Ahmednagar Market Committee) नगर बाजार समितीच्या प्रशासकाचे कारण काही वेगळेच आहे. आता (Arrivals Increased) कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय त्या तुलनेत विक्री होत नाही त्यामुळे रविवारी व सोमवारी येथील (Onion Market) कांद्याचे व्यवहार हे बंद राहणार असल्याचे निर्णय प्रशासनाने आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. नगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समिती आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक असते.
बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत कांद्याची विक्री होत नाही. त्यामुळे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याचे दोन लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, अडचण झाली आहे. एकीकडे वातावरणामुळे कांद्याच्या दरात घसरण होत आहे. तर दुसरीकडे विक्रीचाही पर्याय बंद आहे. येथील बाजार समितीमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा, पाटोदा या भागातील कांद्याची आवक होत असते. पण आता दोन व्यवहार हे बंद राहणार आहेत.
सध्या उन्हाळी हंगामातील साठवणूकीतल्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. शिवाय कांद्याचे मार्केटही स्थिर नाही. त्यामुळे खरेदी आणि विक्रीचेही नियोजन व्यापाऱ्यांना सहज शक्य होईना झाले आहे. यातच आता नव्याने खरीप हंगामातील कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून आता खरेदी केलेला कांदा दोन दिवसांमध्ये मार्गी लावायचा आणि त्यानंतरच कांद्याची खरेदी सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. पावसाने कांदा भिजल्यामुळे आवक मोठी होत असली तरी खरेदीदार नाही. मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने दोन दिवस बंद करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या अनेक ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरु आहे. यातच पावसाने कांदा खराब होऊ नये म्हणून कापणी झाली की कांदा थेट बाजारात दाखल केला जात आहे. त्यामुळे आवक ही वाढलेली आहे. पण असे असले तरी व्यापारी आणि प्रशासनानी घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. कांदा व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली असल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत पणन महासंघाने कांदा लिलाव बंद ठेवायला परवानगी नसताना लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाच कसा? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.