Nanded : पावसामुळं शिवाराचं चित्र बदललं, नांदेडात कधी नव्हे ते धान पीक बहरलं..!

काळानुरुप शेतीचे चित्र बदलत आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठावाड्यावर निसर्गाची कायम अवकृपाच राहिलेली होती. तेलंगणा सीमावर्ती भाग असलेल्या नांदेडच्या या तिन्ही तालुक्यात गावरानी तांदळाची शेती पूर्वी मोठ्या प्रमाणात होत असे मात्र मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातशेती मध्ये मोठी घट झाली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे.

Nanded : पावसामुळं शिवाराचं चित्र बदललं, नांदेडात कधी नव्हे ते धान पीक बहरलं..!
अधिकच्या पावसामुळे मराठवाड्यात पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात भातशेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 23, 2022 | 9:14 AM

नांदेड : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. केवळ पारंपरिक पिकांवरच भर न देता नगदी पिकांचेही क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा (Heavy Rain) अधिकच्या पावसाने नांदेड जिल्ह्यात भात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. (Paddy Crop) धान पिकाच्या लागवडी दरम्यानच अधिकच्या पावसाची गरज असते. यंदा मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. त्याचा परिणाम आता पाहवयास मिळत असून खरिपतील सोयाबीन, तूर, कापसाबरोबर जिल्ह्यातील सीमावर्ती भागामध्ये भात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचा उद्देश साध्य होईल असेच सध्याचे वातावरण आहे.

सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा प्रयोग

अतिवृष्टीमुळे खरिपातील काही पिकांना धोका निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातील पीक पध्दतीमध्ये बदल होण्यास हा पाऊसच कारणीभूत आहे. अधिकच्या पावसामुळे धर्माबाद-बिलोली आणि देगलूर तालुक्यात अगदी कोकणाप्रमाणे भातशेतीने परिसर हिरवागार झालाय. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हरफलो झाल्याने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांत यंदा वाढ झाल्याचे दिसतंय. शिवाय सध्याच्या पोषक वातावरणामुळे पिकाची जोमात वाढही होत आहे.

गवरान भात शेतीची होती परंपरा

काळानुरुप शेतीचे चित्र बदलत आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठावाड्यावर निसर्गाची कायम अवकृपाच राहिलेली होती. तेलंगणा सीमावर्ती भाग असलेल्या नांदेडच्या या तिन्ही तालुक्यात गावरानी तांदळाची शेती पूर्वी मोठ्या प्रमाणात होत असे मात्र मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातशेती मध्ये मोठी घट झाली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. यंदा तर हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी अशा पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यात भात शेतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. नांदेडकरांना गावरानी तांदळाची चव चाखता येणार आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

जून महिन्यात गायब झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या दिवसापासून असा काय बरसलेला आहे की शेती चित्रच बदलले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही नांदेड जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकरी आता नवनवीन प्रयोग करीत आहे. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी पुढील दोन दिवस मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा फायदा भातशेतीला होईल मात्र, इतर पिकांचे नुकसान हे ठरलेले आहे.

Follow Us