आधी कुऱ्हाड अन् आता ट्रॅक्टर! शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपेना

| Updated on: Dec 21, 2020 | 9:13 AM

एक शेतकरी पपईच्या झाड्यांवर कुऱ्हाड चालवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अतिवृष्टीमुळे त्याचं किती नुकसान झालं आणि त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यानं पपईची झाडं मोडून टाकली. आता त्याच शेतकऱ्यानं उरल्यासुरल्या पपईवर ट्रॅक्टर चालवला आहे.

आधी कुऱ्हाड अन् आता ट्रॅक्टर! शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपेना
Follow us on

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. वराती मागून घोडं अशीच काहीशी गत केंद्राची झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी शेतकऱ्यांवरचं शुक्लकाष्ट अद्याप संपलेलं दिसत नाही. कारण अतिवृष्टीदरम्यान पपईचं उत्पादन घेणारा एक शेतकरी पपईच्या पिकांवर कुऱ्हाड चालवतानाचा व्हिडीओ आपण पाहिला असेल. पण आता त्याच शेतकऱ्यानं पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवलाय. (farmer drove a tractor on a papaya crop)

पैठण तालुक्यातील वडजी गावातील एक शेतकरी पपईच्या झाड्यांवर कुऱ्हाड चालवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अतिवृष्टीमुळे त्याचं किती नुकसान झालं आणि त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यानं पपईची झाडं मोडून टाकली. आता त्याच शेतकऱ्यानं उरल्यासुरल्या पपईवर ट्रॅक्टर चालवला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच मोठं नुकसान झालं आणि आता शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं आहे.

केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारीच (20 नोव्हेंबर) दोन दिवसीय दौऱ्यासाठी मराठवाड्यात दाखल झालंय. या दोन दिवसांच्या दौऱ्यात केंद्रीय पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील मिळून 15 गावांमधील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील 9 गावांची हे केंद्रीय पथक पाहणी करणार असून, औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यांतील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान झालेल्या पिकाची आणि भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करीत असून, आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा, लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, तुळजापूर तालुक्यातील काक्रबा, अपसिंगा आणि कात्री भागाची पाहणी करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 881 शेतकऱ्यांच्या 2 लाख 59 हजार 255 हेक्टर क्षेत्रातील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस पिकासह पपई, ऊस आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तर अनेक घरांची पडझड झाली, मात्र अद्याप मदत मिळालेली नाही.

संबंधित बातम्या:

तुमच्या जिल्ह्यात केंद्राचं पथक कधी? वाचा सविस्तर माहिती

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे ‘वरातीमागून घोडे’!

farmer drove a tractor on a papaya crop