…म्हणून केळींच्या बागांवर कुऱ्हाड, बागायतदार शेतकरीही दुहेरी संकटात

| Updated on: Dec 18, 2021 | 4:30 PM

केवळ अवकाळीमुळेच फळबागांचे नुकसान झाले असे नाही तर या नुकसानीला प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याचे आता समोर येत आहे. निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहेच. शिवाय, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केळीला ठरलेल्या दराच्या तुलनेत यंदा निम्यानेही दर मिळत नाही.

...म्हणून केळींच्या बागांवर कुऱ्हाड, बागायतदार शेतकरीही दुहेरी संकटात
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

जळगाव : केवळ अवकाळीमुळेच फळबागांचे नुकसान झाले असे नाही तर या नुकसानीला प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याचे आता समोर येत आहे. निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहेच. शिवाय, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. (Banana Garden) केळीला ठरलेल्या दराच्या तुलनेत यंदा निम्यानेही दर मिळत नाही. एकीकडे (Untimely Rain) अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे झालेले नुकसान तर दुसरीकडे घटते दर. दुहेरी संकटातून मुक्त होण्यासाठी (Farmer) शेतकरी थेट बागांवर कुऱ्हाडच चालवत आहे. मध्यंतरी नांदेडमध्ये करपा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने बागच तोडून काढली तर आता घटत्या दरामुळे बाग का जोपासली असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

काय आहे केळीच्या दराचे वास्तव?

प्रत्येक फळाचे दर हे शासनस्तरावर ठरलेले असतात. त्याचप्रमाणे केळीला 1 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर ठरला होता. त्यामुळे भरघोस उत्पादन होईल असा आशावाद फळबागायत शेतकऱ्यांना होता. पण निसर्गाप्रमाणेच शासनाची धोरणेही बदलली. गेल्या काही महिन्यांपासून 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे वर्षभर जोपासना करुन 300 रुपयांचा दर कसा परवडेल असा प्रश्न आहे. त्यामुळेच शेतकरी काढणी आणि वाहतूकीचा खर्च करण्यापेक्षा केळीच्या बागेवर कुऱ्हाड चालवणे पसंत करीत आहे.

खरेदीदार अन् व्यापाऱ्यांची खेळी

उत्पादन काढण्यासाठी अथक परिश्रम करुनही शेतकरी मालाचा दर ठरवू शकत नाही. बाजार समितीमध्ये याचे दर ठरतात. त्याचप्रमाणे केळीला 1 हजार रुपये क्विंटलचा दर हा ठरलेला आहे. मात्र, आता कोरोनामुळे उठावच नसल्याचे सांगत खरेदीदार अन् व्यापारी हे संगनमत करुन दर पाडत असल्याचा आरोप पाचोरा तालुक्यातील शेतकरी संघटनेने केला आहे. या दरावर प्रशासनाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे मागेल त्या दरात शेतकऱ्यांना केळीची विक्री करावी लागत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी विक्री न करता बागच शेतीबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी

आगोदरच पावसामुळे फळबागांसह खरीप, रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवाय फळबागांनाही अवकाळी पावसाचा व बदलत्या वातावरणाचा परिणाम झालेलाच आहे. खानदेशासह मराठवाड्यातही फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, सातत्याने होणारे नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. यातच दर घसरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागेची तोडणी केली आहे. आता व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक घडवून योग्य तो निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा अधिकच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा

ऊसाच्या पाचटाचे करायचे काय? जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती भारतामध्येच..! काय आहेत फायदे ? जाणून घ्या सर्वकाही