पावसानं टेन्शन वाढवलं, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! 86 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

| Updated on: Jul 07, 2021 | 1:17 PM

मागील काही दिवसांमध्ये पावसाने ओढ दिल्यानं बीड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

पावसानं टेन्शन वाढवलं, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! 86 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण
शेतकरी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी बीड: मागील काही दिवसांमध्ये पावसाने ओढ दिल्यानं बीड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातूर असून, येणाऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. (Beed farmers facing problems due to low rain in monsoon farmers said they facing problem of second time cultivation)

बीडमधील 86 टक्के पेरण्या पूर्ण

मृग नक्षत्रातील पाऊस वेळेवर बरसल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. परंतु मागील काही दिवसात पावसाने ओढ दिली आणि शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात 86 टक्के पेरण्या पुर्ण झाल्यात. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या माञ आता पावसाने ओढ दिलीय, असं शेतकरी केशव पारधे यांनी सांगितलंय.

सोयाबीनचं क्षेत्र वाढलं

जिल्ह्यात 7 लाख 91 हजार खरीपाचे क्षेत्र असून यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र वाढलं आहे. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या ओढीने शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी आजही काही शेतकरी दमदार पावसानंतर पेरणी करणार असल्याचे सांगत आहेत.

मागील आठवडाभरात केवळ दोन दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी खुरपणी, कोळपणीचे काम सुरू केली आहेत. आता पाऊस झाला नाही तर मात्र पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल या चिंतेत सध्या शेतकरी आहेत, असं दत्तात्रय मुंडे यांनी सांगितलंय.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या करून घेतल्या नंतर पाऊस लांबणीवर पडलाय. ऊन सावलीचा खेळ सुरू असताना आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेत. उसनवारी करून महागाईचे बी बियाणे खरेदी करून आपल्या काळया आईची ओटी भरली, आता वरून राजा मनसोक्त बरसावा आणि शेतकरी सुखावा अशीच इच्छा शेतकरी वर्ग व्यक्त करतोय.

बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

महाराष्ट्रात जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसानं हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक अकोला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या:

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

Weather report: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

(Beed farmers facing problems due to low rain in monsoon farmers said they facing problem of second time cultivation)