Kharif Season : वरुणराजाची अशी ही अवकृपा, गरजेच्या वेळी मारली दडी, वाशिम जिल्ह्यात खरीप संकटात

हंगामाच्या सुरवातीला अधिकच्या पावसामुळे पिकांची वाढ जोमात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची फवारणी कामे करावी लागली. मशागत, औषधांची फवारणी करुन सोयाबीन जोमात आले खरे पण आता पावसाअभावी कोमात गेले आहे. ऐन फळधारणेच्या अवस्थेतच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.

Kharif Season : वरुणराजाची अशी ही अवकृपा, गरजेच्या वेळी मारली दडी, वाशिम जिल्ह्यात खरीप संकटात
पावसाअभावी पिकांचे नुकसान होत आहे.
| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 5:25 PM

वाशिम : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून ओढावलेले संकट आता हंगाम मध्यावर असतानाही कायम आहे. (Kharif Sowing) पेरणी होताच सुरु झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ होणार की नाही याबाबत शंका होती. जुलै महिन्यात (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण आता त्याच पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून गायब झालेला पाऊस हा परतलेलाच नाही. खरीप पिके ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. हंगामाच्या सुरवातीला अधिकच्या पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला होता तर आता पावसाविना ही पिके कोमजून जात आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे तर अनेक भागातील शेतकऱ्यांना येत आहे.

न भरुन निघणारे नुकसान

हंगामाच्या सुरवातीला अधिकच्या पावसामुळे पिकांची वाढ जोमात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची फवारणी कामे करावी लागली. मशागत, औषधांची फवारणी करुन सोयाबीन जोमात आले खरे पण आता पावसाअभावी कोमात गेले आहे. ऐन फळधारणेच्या अवस्थेतच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. शिवाय आता पिकाला फटका बसला तर मात्र हे न भरुन निघणारे नुकसान असणार आहे. त्यामुळे खरिपावर संकटाची मालिका सुरु असून दोन-चार दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली नाहीतर मात्र, उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे.

शेतकऱ्यांचे केविलवाणे प्रयत्न

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आता तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाणीसाठा आहे पण विजेचा लपंडाव आणि सोयाबीनचे क्षेत्र पाहता सर्वच पिकांना पाणी देणे मुश्किल होणार आहे. मात्र, पावसाबाबत शेतकरी आशादायी असून काही दिवसांमध्ये पावसाचे पुनरागमन होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

सोयाबीनचे क्षेत्र अधिक

सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भात देखील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. यंदा तर हंगामाच्या सुरवातीलाच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होईल असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.