Kharif Season : कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच सर्वकाही झाले पण नुकसान नाही टळले..! अखेर सोयाबीन पाण्यातच

| Updated on: Aug 06, 2022 | 5:25 PM

खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. मराठवाड्याबरोबर विदर्भात देखील सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला. मात्र, शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी होतो की नाही याबाबत शंका आहे. कारण अधिकच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकालाच बसलेला आहे.

Kharif Season : कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच सर्वकाही झाले पण नुकसान नाही टळले..! अखेर सोयाबीन पाण्यातच
अधिकच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वाशिम : यंदाच्या (Kharif Season) खरिपात शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न केले. मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे अखेर हात टेकवले आहेत. आतापर्यंत (Agricultural Department) कृषी विभागाच्या सल्ल्याकडे शेतकरी गांभिर्यांने पाहत नव्हता पण उत्पादनात वाढ आणि नवनवीन प्रयोगाचे महत्व अधिकाऱ्यांनी थेट बांधावर येऊन सांगितल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरी वरंबा पद्धतीने (Soybean Crop) सोयाबीनची लागवड केली होती. यामुळे पीक तर जोमात येतेच पण अधिकचा पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होतो आणि पिकांचे नुकसान होत नाही. हे खरे असले तरी यंदा पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की, सरी वरंब्याच्या पार खोळंबा झाला आहे. प्रमाणापेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने अखेर सोयाबीनचे नुकसान हे झालेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच पण आता उत्पादनाचे काय होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सऱ्या फुटून पिके पाण्यात

पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये शिवाय उत्पादनात वाढ व्हावी या अनुशंगाने शेतकऱ्यांनी यंदा प्रथमच बीबीएफ आणि सरी वरंबा पध्दतीने सोयाबीनची लागवड केली होती. रिसोड तालुक्यातील केनवड शेतशिवारात या पद्धतीचा अधिक अवलंब केला होता. त्यामुळे यंदा किमान उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण जुलैच्या 1 तारखेपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. त्यामुळे शेतशिवाराला तळ्याचे स्वरुप आले आहे. जागोजागी पाणी साचले आहे. पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण ज्यासाठी सऱ्यावर लागवड केली तो उद्देशही पाण्यातच अशी अवस्था झाली आहे.

सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे

खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. मराठवाड्याबरोबर विदर्भात देखील सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला. मात्र, शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी होतो की नाही याबाबत शंका आहे. कारण अधिकच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकालाच बसलेला आहे. तरी शासन व प्रशासन यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केनवड येथील शेतकरी किसन ज्ञानबा खराटे,भीमराव गुजकर ,सुभाष जनार्दन खराटे या शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विभागाचे होते मार्गदर्शन

पारंपरिक पद्धतीने सोयाबीनचा पेरा केला तर उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी सरी वारंबा आणि बीबीएफ पद्धतीने दर लागवड केली तर उत्पादनात वाढ होईल. शिवाय यासंबंधीचे प्रयोगही करुन दाखवण्यात आले होते. यंदाचे पोषक वातावरण आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांनी हा बदल केला होता. पण पावसामुळे सर्वकाही पाण्यात अशी स्थिती झाली आहे.