Summer Onion : काढणीविना कांद्याचा वांदा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कांदा शेतातच

कांद्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतीकामासाठी कोणी धजतच नाही. केवळ कांदा काढणीच नाही तर पुन्हा छाटणी आणि भरणे ही कामे मजुरांना करावी लागतात. त्यामुळे वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळेनात अशी अवस्था आहे. शिवाय कांद्याचे दरही 200 ते 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत.

Summer Onion : काढणीविना कांद्याचा वांदा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कांदा शेतातच
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 05, 2022 | 1:16 PM

पुणे : वाढत्या दरामुळे रात्रीतून कांद्याचा शिवार मोकळा झाल्याचे चित्र काही महिन्यापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. तर आता (Onion Rate) कांद्याचे दर घटल्याने काढणीला महत्वच दिले जात नाही. कांद्याचे दर एवढे घसरले आहेत की, त्यामुळे मजुरांवरील खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. यातच सध्याच्या (Temperature) उन्हाच्या झळामुळे मजूर मिळणेही मुश्किलच झाले आहे. वाढत्या दरामुळे दोन महिन्यापू्र्वी कांद्याला असलेले महत्व आणि आजची स्थिती यामध्ये मोठा फरक आहे. मात्र, यावेळच्या दरातील लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. (Summer Crop) हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही कांदा हा वावरातच आहे. आता वाढीव उत्पादनामुळे नाही तर खरिपासाठी क्षेत्र रिकामे व्हावे म्हणून कांदा न काढताच मशागतीची कामे केली जात आहेत.

वाढत्या उन्हाचाही परिणाम

कांद्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतीकामासाठी कोणी धजतच नाही. केवळ कांदा काढणीच नाही तर पुन्हा छाटणी आणि भरणे ही कामे मजुरांना करावी लागतात. त्यामुळे वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळेनात अशी अवस्था आहे. शिवाय कांद्याचे दरही 200 ते 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत. काढणी, छाटणी आणि बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी वाहतूकीचा खर्च यामुळे शेतकरीही कांद्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिवाय आता खरिपासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या हेतून कांदा काढून सरळ बांधावर टाकला जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.

व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दर

मूळात कांद्याची मागणीच घटली आहे. खरिपातील लाल कांदा संपल्यानंतर कांद्याची घटलेली मागणी आणखीनही सुधारलेली नाही. उन्हाळी हंगामातील कांदा चांगला असताना देखील 4 ते 5 रुपये किलोने मागणी होत आहे. त्यामुळे काढणी आणि इतर खर्च कऱण्यापेक्षा सरळ रोटाव्हेटरने मशागत केल्यावर कांदा काढणी तर होतेच पण मशागतही केली जाते. असे म्हणत शेतकरी आता वाढीव उत्पादनाची अपेक्षा न करता कांदा शेताबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

63 हजार हेक्टरावर कांदा लागवड

उसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, अनिश्चित दरामुळे उत्पन्न मिळेलच असे नाही तर काही शेतकरी हे नफा-तोट्याचा विचार न करता उत्पादन घेतातच. राज्यात सर्वत्रच कांद्याचे क्षेत्र हे वाढत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 63 हजार हेक्टरावर कांदा लागवड झाली होती. हंगामाच्या सुरवातीला मागणी असल्याने 12 ते 14 रुपये किलो असा दर होता. पण आता दरात घट झाल्याने जवळपास निम्म्या क्षेत्रावरील कांदा काढणीविना पडून आहे.