पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात, फळ बागायत शेतकऱ्यांवर अवकाळीची ‘अवकृपा’

| Updated on: Nov 18, 2021 | 12:10 PM

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील बागायत शेतकऱ्याची. द्राक्ष बागेला फळही जोमात आले होते. त्यामुळे या आठड्यात बागेच्या खरेदीसाठी व्यापारीही येणार होते मात्र, ऐन वेळी पावसाने हजेरी लावली अन् द्राक्षांच्या घडातच पावसाचे पाणी साचले. त्यामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. आता बाग घेण्यासाठी व्यापारीही फिरकतील की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात, फळ बागायत शेतकऱ्यांवर अवकाळीची अवकृपा
अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे
Follow us on

पुणे : गेल्या 12 वर्षांपासून ( grape plantation) द्राक्ष बागेचे जोपासना तळहाताच्या फोडाप्रमाणे केली जातेय. यंदाही अतिवृष्टीचा धोका होता मात्र, त्याचा फारसा परिणाम द्राक्ष बागांवर झालेला नव्हता. आता पावसाने उघडीप दिल्याने सर्वकाही सुरळीत होणार द्राक्ष बागेला योग्य दरही मिळणार याबाबत बागायतदार शेतकरी स्वप्न रंगवत असतानाच (Untimely rains) अवकाळीची अवकृपा झाली आणि होत्याचे नव्हते झाले. ही कथा आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील बागायत शेतकऱ्याची. द्राक्ष बागेला फळही जोमात आले होते. त्यामुळे या आठड्यात बागेच्या खरेदीसाठी व्यापारीही येणार होते मात्र, ऐन वेळी पावसाने हजेरी लावली अन् द्राक्षांच्या घडातच पावसाचे पाणी साचले. त्यामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. आता बाग घेण्यासाठी व्यापारीही फिरकतील की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील देविदास पुणेकर हे गेल्या 12 वर्षापासून द्राक्षेचे उत्पादन घेत आहेत. मात्र, यंदाचे नुकसान हे जिव्हारी लागणारे आहे. अंतिम टप्प्यात बाग असताना झालेले नुकसान कसे भरुन काढावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

योग्य दर मिळूनही चिंता कायम

देविदास पुणेकर यांनी अडीच एकरामध्ये द्राक्ष लागवड केले होते. त्यांच्या योग्य नियोजनामुळे उत्पादनही वाढले होते. त्यामुळे द्राक्षांची योग्य किंमतीमध्ये विक्रीही झाली होती. पण आता अवकाळीमुळे मालाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी थेट द्राक्षाच्या घडात शिरल्याने त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे आता व्यापारी काय निर्णय घेतात यावरच सर्वकाही अवलंबून आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच व्यापारी खरेदीसाठी येणार होते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. उत्पादनात तर घट होणारच आहे. पण अवकाळी पावसाची अशीच अवकृपा राहिली तर उरलेले पिकही हाती लागणार नाही.

निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांचे नुकसान

अतिवृष्टीने झालेले नुकसान कमी होते की काय आता त्यात अवकाळीची भर पडत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसत आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण होत असताना आता अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे नुकसान होऊ लागले आहे. फळबागांवर या अवकाळी पावसाचा परिणाम झालाच आहे. शिवाय खरीपातील तूरीवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ऐन काढणीच्या दरम्यानच वातावरणात बदल होत असल्याने सोयाबीन प्रमाणेत तूराचेही नुकसान होणार आहे.

खराब माल आता बांधावर

ज्या उत्पादनातून देविदास पुणेकर यांना चार पैसे मिळणार होते आता तेच द्राक्षे बांधावर फेकून देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. बुधवारी रात्री पावसामुळे नुकसान झाले आणि आज सकाळी त्यांना द्राक्षाच्या घडात पावसाचे पाणी शिरल्याने असे घड काढून बांधावर फेकावे लागत आहे. यामुळे 60 टक्के मालाचे नुकसान झाले असून पाऊस असाच लागून राहिला तर उरलेले पिकही हाती लागणार नाही.

पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी

पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे. अडीच एकरावरील द्राक्ष बाग जोपासण्यासाठी पुणेकर यांना 5 लाखाचा खर्च झाला होता. आता अंतिम टप्प्यात झालेले नुकसान न भरुन निघणारे आहे. इंदापूर, तरंगवाडी,गोखळी परिसरातील शेतकऱ्यांच्या बागेचे नुकसान झाले असून कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी देविदास पुणेकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

रिलायन्स विमा कंपनीचे अणखीन एक गुपित समोर, चौकशीनंतर होणार कारवाई

सातबाऱ्याच्या प्रलंबित फेरफारची माहिती आता डॅशबोर्डवर, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय

साखर कारखान्यांचे गाळप परवाने थांबवले, शेतकऱ्यांना 90 कोटी मिळाले,सरकारच्या प्रयत्नाला यश