विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता काय अवस्था ?

| Updated on: Oct 26, 2021 | 10:29 AM

हिंगोली जिल्ह्यातील एकंबा येथील शेतकऱ्याने केवळ 3 क्विंटल सोयाबीन आणले होते. यालाही सरासरीप्रमाणे दर मिळेल असा आशावाद होता, मात्र, जाहीर निलावात या सोयाबीनला तब्बल 11 हजार 21 असा दर मिळाला होता. मात्र, आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4 हजार 600 ते 4 हजार 800 दर मिळत आहे.

विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता काय अवस्था ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

हिंगोली : सोयाबीन हंगामाच्या सुरवातीला आणि पावसाने पीकाचे नुकसान होण्यापूर्वी (Hingoli Market) हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असेच काहीसे चित्र सबंध राज्यात निर्माण झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील एकंबा येथील शेतकऱ्याने केवळ 3 क्विंटल सोयाबीन आणले होते. यालाही सरासरीप्रमाणे दर मिळेल असा आशावाद होता, मात्र, जाहीर निलावात या सोयाबीनला तब्बल 11 हजार 21 असा दर मिळाला होता. मात्र, आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4 हजार 600 ते 4 हजार 800 दर मिळत आहे. (Soyabean prices fall by more than half) केवळ दीड महिन्याच्या कालावधीत सोयाबीनच्या दरात अशी काय घसरण झाली आहे की, विक्रीपेक्षा शेतकरी साठवणूकीवर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे.

दीड महिन्याच्या कालावधीत सोयाबीनच्या दरात असा काय फरक झाला आहे याची कल्पनाही कधी शेतकऱ्यांनी केलेली नसेल. हिंगोली येथे मुहुर्ताचा दर हा 11 हजाराचा मिळाला असला तरी किमान 8 ते 9 हजार क्विंटलचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित होता. आज मात्र, सोयाबीनचा दर हा 5 हजारापेक्षा कमी झालेले आहेत. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत आणि पैसाही खर्च केला आहे. पावसाने ओढ दिली त्या काळात स्प्रिंक्लरने सिंचनाचे काम केले तर किडीचा प्रादुर्भाव वाढताच वेळोवेळी औषध फवारणी केलेली होती. त्यामुळे अधिकचा खर्च झाला आहे. मात्र, आता सोयाबीनला 4 हजार 500 चा दर मिळत आहे. त्यामुळे काढणी, मळणी, वाहतूक आणि झालेला खर्च पाहता सोयाबीन सध्याच्या किमतीमध्ये विकले तर तोट्यातच राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हे भविष्यात दर वाढतील या आशेवर साठवणूकीवर भर देत आहेत.

काय आहेत सोयाबीनचे दर?

हंगामाच्या सुरवातीला म्हणजे सप्टेंबर महिन्यात हिंगोली येथे एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11 हजार रुपये क्विंटलला दर मिळाला होता. या दराची चर्चा सबंध राज्यात झाली होती. शिवाय तीनच क्विंटल सोयाबीन एकंबा येथील शेतकऱ्याने बाजारात आणले होते. मात्र, भविष्यात सोयाबीनला चांगले दर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण सध्या हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वात कमी दर मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमाल दर हा 4 हजार 600 तर किमान दर 4 हजार 800 एवढा आहे. इतर बाजार समित्यांपेक्षा कमीचा दर हा हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमी दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला विक्रमी दर देऊन सुरवात करणाऱ्या या बाजार समितीच्या दराची चर्चा आता मराठवाड्यात होत आहे.

कशामुळे झाली दरात घसरण?

हंगामाच्या सुरवातीला पिकाची बाजारपेठेत आवक झाली की मुहूर्ताचे दर म्हणून व्यापारी अधिकचे दर देतात. जेणेकरुन आवक वाढत राहील. त्याप्रमाणेच एकंबा येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11 हजाराचा दर देण्यात आला होता. त्यानंतर हा प्रयोग बार्शी, अकोला या बाजार समितीमध्येही झाला होता. मात्र, पुन्हा सोयाबीन ऐन काढणीला आले असतानाच पावसाला सुरवात झाली व खरीपातील सर्वच पिके ही पाण्याच गेली. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते सोयाबीनचे. सोयाबीन काळवंडले होते. त्याच्या गुणवत्तेवर तर परिणाम झालाच शिवाय सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर हे घसरले आहेत.

संबंधित बातम्या :

पीकांना रानडूकरांचा धोका, मग असे करा पीक संरक्षण..!

खाद्यतेलाच्या दरावरुन पुन्हा केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, तेलबियांच्या साठ्यावर लक्ष केंद्रीत करा

सोयाबीनचे दर गडगडले, ऐन सणात शेतकऱ्यांची अडचण, वाचा शेतीमालाचे दर