पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

जर वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल, या भीतीने दमदार पाऊस पडण्याआधी पेरणी केली.

पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
महाराष्ट्रातील शेतकरी (फोटो प्रातनिधिक)
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 1:44 PM

लासलगाव : राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Maharashtra Crisis of double sowing in Yeola taluka farmers in worry due to stop raining)

मान्सूनपूर्व पावसाने येवला तालुक्यात दमदार हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणीकडे कल वाढवला. पण गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसाची उघडीप सुरु आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

नाशिकातील येवला तालुक्यात सरासरी 48 मिमी एवढा पाऊस झाला. जवळपास 100 मिमी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करणे अपेक्षित होते. मात्र मान्सून पूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी या पावसावर 20 हजार हेक्टरवर पेरणी केली. जर वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल, या भीतीने दमदार पाऊस पडण्याआधी पेरणी केली.

पण आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जर पावसाने दडी मारली नसती तर 73 हजार हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित होते.

खरीपाच्या पेरण्या आणि लागवडीस सुरुवात

राज्यात मान्सून दाखल होण्याअगोदर मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण झाल्याने खरीपाच्या पेरण्या आणि लागवड करण्यास सुरुवात केली. मात्र पेरणी करण्यासाठी अपेक्षित ओलावा असल्याने काही शेतकऱ्यांनी मका, कपाशी, बाजारी आणि सोयाबीन पेरणी केली आहे. यामागे त्यांनी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला.

दुबार पेरणीसाठी मोठी आर्थिक मदत करा, शेतकऱ्यांची मागणी

मात्र पावसाने दडी मारली. त्यातच रोज कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी देखील होणार असल्याचे दिसत आहे. आता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची मागणी बळीराजा करत आहे. (Maharashtra Crisis of double sowing in Yeola taluka farmers in worry due to stop raining)

संबंधित बातम्या : 

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये

सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

ऑटो मेकॅनिकची नोकरी सोडून शेतीचा निर्णय , आंब्याच्या बागेसह नर्सरीतून काकासाहेब सावंत यांची 50 लाखांची कमाई