दान पावलं, रान भिजलं; निम्म्या राज्यात पाऊसधारा

केरळवरुन सुवार्ता घेऊन आलेल्या पाऊसराजा चौखुर उधळला आहे. त्याने निम्मा महाराष्ट्र पादाक्रांत केला असून लवकरच तो विदर्भातील अनेक भागात पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला गती येईल.

दान पावलं, रान भिजलं; निम्म्या राज्यात पाऊसधारा
राज्यभर पावसाची हजेरी
Image Credit source: सोशल मीडिया
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 13, 2022 | 7:29 PM

नैर्ऋत्य मौसमी वा-यांनी पुन्हा आनंदवार्ता आणली आहे. आतापर्यंत काही पट्टयात हजेरी लावणारा वरुणराज येत्या दोन दिवसांत आगेकूच करुन संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनने(Mansoon) आज जवळपास निम्म्या राज्यात आनंदवार्ता पेरली. नंदुरबार ते पार नांदेडपर्यंतच्या पट्टयात पावसाने हजेरी लावली. तर विदर्भाच्या सीमावर्ती भागातील काही भागात त्याने दणक्यात प्रवेश केला. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील(Vidharbha) ज्या भागात पाऊस पडलेला नाही, त्या भागात येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला अधिक वेग येईल. मराठवाडयातील अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्याला आता पूर्वोत्तर राज्यात ही रसद मिळणार असल्याने विदर्भातील अनेक भागात जलधारा बरसतील.

दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दाखल

केरळनंतर गोव्याचा टप्पा मान्सूनने जोरात गाठला. पण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात त्याच्या धडका पोहचेना. त्यामुळे निर्धारीत 7 जूनचा मुहुर्त हुकल्यानंतर शेतक-यांच्या नजरा आपोआप आकाशाकडे खिळल्या होत्या. अखेर दहा दिवसांच्या बहुप्रतिक्षेनंतर पावसाने एकदाचा कोकणात तळ ठोकला. 10 जून रोजी पावसाने कोकणात दस्तक दिली. त्यानंतर त्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात डेरा टाकला. आजपर्यंत पावसाने निम्म्यांहून महाराष्ट्र पादाक्रांत केला आहे. आता यापूढे मान्सून विदर्भ, दक्षिण गुजरात, कर्नाटकतील बहुतांश परिसर, तेलंगाणा, रायलसीमा असा प्रवास करत तामिळनाडूतही दस्तक देणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कसे होते मान्सूनचे आगमन निश्चित

आनंदवार्ता घेऊन येणारे नैर्ऋत्य मान्सून वारे आणि मान्सूनची वाटचाल मोजण्याचे हवामान विभागाचे काही परिमाण आहे. आयएमडीकडे याविषयीची एक चेकलिस्ट आहे. नैर्ऋत्य वारे मान्सूनचा दूत म्हणून केरळात दाखल होतो. मान्सूनच्या वाटचालीची तशी लोकेशन देण्यात आलेली आहे. मान्सूनची अधिकृत माहिती देण्यापूर्वी या भागात किती पाऊस झाला होता. याची तपासणी आयएमडी करते. 14 नियुक्त हवामान स्थानकांपैकी 60 टक्के ठिकाणी 10 मे नंतर सलग 2 दिवस 2.5 मिमी अथवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास मान्सूनची खबरबात पक्की होते आणि हवामान खाते मान्सूनच्या आगमनाची बातमी जाहीर करते.

यंदा धुवाधार बॅटिंग

यंदा संपूर्ण देशात भरसो रे मेघा असे वातावरण होणार आहे. पाऊस तडाखेबंद बॅटिंग करण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 96 टक्के ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान खाते प्रत्येक महिन्याच्या शेवटी मान्सूनविषयीचा अंदाज व्यक्त करते. त्यावरुन शेतक-यांना आणि सर्वसामान्यांना पावसाचे चित्र स्पष्ट होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us