Jalna : सेंद्रीय शेती पध्दतीने आंब्याचा वाढला गोडवा, एका एकरामध्ये 4 लाखाचे उत्पन्न

| Updated on: May 22, 2022 | 4:11 PM

मराठवाड्यातील शेतकरी हे नवनवीन प्रयोग करण्यास धजावत नाहीत. केवळ रब्बी आणि खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण खानापूरातील गजानन कराळे हे दरवर्षी नवनवीन प्रयोग करतात. त्यामुळेच सुरवातीला त्यांनी एक एकरात केशर आंब्याची लागवड केली होती. याकरिता रासायनिक खतांचा नाही तर सेंद्रीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्धार त्यांनी लागवड करतानाच केला होता.

Jalna : सेंद्रीय शेती पध्दतीने आंब्याचा वाढला गोडवा, एका एकरामध्ये 4 लाखाचे उत्पन्न
आंबा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जालना : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Mango Production) आंबा उत्पादकांना बसलेला आहे. आंब्याचे माहेर घर असलेल्या कोकणात देखील आंबा उत्पादक हे त्रस्त होते. असे असताना (Marathwada) मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने आंबा उत्पादनाचा नवा पॅटर्नच समोर आणला आहे. जाफराबाद तालुक्यातील खानापूर येथील गजानन कराळे यांनी केशर आंब्याची लागवड केली होती. (Organic Farm) सेंद्रीय पध्दतीने आंब्याची जोपसणा करुन त्यांना एका एकरामध्ये 4 लाखाचे उत्पन्न झाले आहे. नवनवीन प्रयोगातून समोर आलेला हा आंबा उत्पादनाचा प्रयोग आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर इतर शेतकऱ्यांनीही या प्रयोगाचे अनुकरण करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न केला आहे.

पारंपरिक शेतीतून घटले उत्पन्न

मराठवाड्यातील शेतकरी हे नवनवीन प्रयोग करण्यास धजावत नाहीत. केवळ रब्बी आणि खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण खानापूरातील गजानन कराळे हे दरवर्षी नवनवीन प्रयोग करतात. त्यामुळेच सुरवातीला त्यांनी एक एकरात केशर आंब्याची लागवड केली होती. याकरिता रासायनिक खतांचा नाही तर सेंद्रीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्धार त्यांनी लागवड करतानाच केला होता. यानंतरच इस्त्रायल पध्दतीने केशर आंब्याची लागवड केली. लागवडीपासून जोपासणा आणि योग्य व्यवस्थापन यामुळे कराळे यांच्या शेतामध्ये आता आंबे लगडले आहेत.

आंब्याचे योग्य व्यवस्थापनामुळेच हे शक्य

केवळ लागवड करायची म्हणून केली असे नाही तर त्यामधून विक्रमी उत्पन्न घ्यायचे हाच उद्देश कराळे यांचा होता. त्यामुळे लागवड करतानाच एकरी केवळ 650 रोपे लावली होती. शिवाय ड्रीपच्या माध्यमातून सर्व आब्यांना पाणीपुरवठा करुन या झाडांना शेणखताची मात्रा देऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कोकणात फळबागांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, मराठवाड्यात निसर्गाच्या लहरीपणाचा एवढा प्रादुर्भाव जाणवला नाही. म्हणूनच कराळे यांना एकरी 4 लाखाचे उत्पन्न झाले आहे. 5 फुटावर एक झाड अशा पध्दतीने लागवड केल्याने देखील उत्पादनात भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

आंबा बाग क्षेत्र वाढले

खानापूर शिवारात गजानन कराळे यांनी आंबा फळबागांची ते ही अत्याधुनिक पध्दतीने लागवड केली असली तरी आता तालुक्यातील शेतकरी त्यांचे अनुकरण करीत आहेत. त्यांच्याबरोबर इतर शेतकऱ्यांनीही इस्त्रायल पध्दतीने आंबा लागवड केली असून त्यांनादेखील वाढीव उत्पन्नाची आशा आहे. एका शेतकऱ्याने केलेला बदल आता सर्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीमधून उत्पन्न वाढत नाही ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृतीला कृषी विभागाने मार्गदर्शन केले तर काहीच अशक्य नसल्याचे शेतकरी गजानन कराळे यांनी सांगितले आहे.