करप्याचा कहर, अर्ध्या रात्रीतून पिकताहेत केळी, दीड हजार केळीची झाडे कापली, नांदेडमधील शेतकऱ्याचा संताप

| Updated on: Sep 27, 2021 | 1:07 PM

आर्थिक संकट असह्य झाल्याच्या विवंचनेतून शैलेश लोमटे या अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला. अर्धापूरच्या सर्वच भागात कापणीस आलेल्या केळीच्या बागा करप्यामुळे उध्वस्त होत आहेत.

करप्याचा कहर, अर्ध्या रात्रीतून पिकताहेत केळी, दीड हजार केळीची झाडे कापली, नांदेडमधील शेतकऱ्याचा संताप
करप्याच्या प्रादुर्भावामुळे नांदेडमधील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Follow us on

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur in Nanded) केळी महाराष्ट्रासह परदेशातही प्रसिद्ध आहे. राज्यात जळगावनंतर (Jalgaon for Banana Production) नांदेड जिल्ह्याचा केळी उत्पादनात अग्रक्रम लागतो.  मात्र जवळपास महिनाभरापासून सुरु असलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रात्रीतून केळी पिकून घड सडून जात आहेत. केळी उत्पादनात राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. मात्र सप्टेंबर महिन्यातील पावसाने (Heavy rain in September 2021) केळीवर करपा हा बुरशीजन्य रोग पडला असून यामुळे केळीचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. तसेच पिकविम्यात करप्या आजाराची नोंद नसल्यामुळे नांदेडमधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

दीड हजार केळीची झाडे कापली

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील केळीला महाराष्ट्रातन नव्हे तर संपूर्ण देशात, परदेशातही मागणी आहे. नांदेड जिल्हग्यात अर्धापूरसह मुदखेड तालुक्यात प्रामुख्याने केळीची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यात साधारण 15 हजार हेक्टरवर केळी पिकाचे लागवड क्षेत्र आहे. मात्र सप्टेंबरमधील पावसाने केळीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. हे आर्थिक संकट असह्य झाल्याच्या विवंचनेतून शैलेश लोमटे या अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला. अर्धापूरच्या सर्वच भागात कापणीस आलेल्या केळीच्या बागा करप्यामुळे उध्वस्त होत आहेत. पूर्वी 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळणाऱ्या केळीला 400 ते 500 रुपये क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत आहे. एरवी केळीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या मागे लागतात, मात्र अशा संकटस्थितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची मनधरणी करावी लागते.

करपा आजार काय आहे?

करपा हा अतिपावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे होणारा बुरशीजन्य आजार आहे. यात केळीच्या खालच्या पानावर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके आढळून येतात. कालांतराने याची संख्या वाढून पानांची संख्या कमी होते. त्यामुळे घडांची वाढ खुंटते. घडातील फळे लहान राहून कच्ची केळी पिकण्यास सुरुवात होते. काही ठिकाणी केळी पिकण्याचा हा वेग प्रचंड असून रात्रीतून फळे पिकून सडून जातात. त्यास दुर्गंधीही येते.

आर्द्रतेमुळे प्रसार वाढतो

करप्या रोगाचा प्राथमिक प्रसार हवेद्वारे लैंगिक बीजाणूमुळे होते. किंवा पावसाच्या थेंबाद्वारे पसरतो. तसेच वातावरणातील आर्द्रता, पाऊस आणि तापमान हे घटक रोगाच्या प्रसारास कारणीभूत आहेत. शिवाय ढगाळ वातावरण तसेच आर्द्रतेत वाढ झाल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

करप्यावर नियंत्रण कसे मिळवतात?

केळीची लागवड ओढे, नाले, नदी यांच्या काठावरील, दलदलयुक्त जमिनीत करू नये. तसेच पानांवर काही रोग दिसल्यास ती पाने आधी नष्ट करावीत. वरील काही लक्षणे दिसून येत असल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी. केळीची लागवड केल्यानंतर चार ते पाच आठवड्यांनी प्रोमी कोनॅझोल (टिल्ट) 10 मिली, तसेच त्यात 10 मिली चांगल्या प्रतीचे स्टिकर 10 मिली पाण्यात घेऊन फवारणी करावी, अशी माहिती नांदेड येथील केळी संशोधन केंद्राचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. व्ही. धूतराज यांनी दिली. (Outbreak of karapa on banana crop, banana rot, farmer in Nanded cuts banana trees)

इतर बातम्या-

मुदत अंतिम टप्प्यात तरीही ई-पीक पाहणीचा सावळा गोंधळ सुरुच

मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच