महाराष्ट्रातील शेतकरी ‘लई भारी’, राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत 12 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

| Updated on: Nov 29, 2021 | 8:19 AM

राष्ट्रीय कृषी बाजार अथवा किंवा ई-नाम, ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे तर 257 शेती उत्पाक कंपन्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी लई भारी, राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत 12 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई-नाम, ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या (National Krishi Bazar Yojana) योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे तर 257 शेती उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही बाजारपेठेत (Agricultural Produce) शेतीमालाचे काय दर आहेत याची माहिती होते. एवढेच नाही तर शेतीमाल कोणत्या बाजारपेठेत विक्री करायचा हे देखील ठरविता येणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग तर नोंदवला आहे पण प्रत्यक्षात अजूनही काही शेतकरीच लाभ घेत आहेत.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार, अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टलमध्ये 257 शेतकरी उत्पादक संघटना (FPO), 20339 व्यापारी आणि महाराष्ट्रातील 16 हजार 504 कमिशन एजंट सामील झाले आहेत. राज्यातील ई-नाम नेटवर्कशी 118 मंडया जोडल्या गेल्या असून, त्यापैकी 73 बाजारसमित्या ह्या ऑनलाइन व्यवहार करीत आहेत. देशातील 21 राज्यांमधील शेतकरी या प्लॅटफॅार्मवर सामील झाले असून व्यवहार करीत आहेत.

5 वर्षापासून सुरु आहे योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2016 मध्ये 21 बाजार समित्यांचा यामध्ये सहभाग नोंदवून ‘ई-नाम’ पोर्टंल अॅपचा शुभारंभ केला. यामुळे शेतकरी कोणत्याही बाजार समितीमध्ये पिकांची नोंदणी करुन शेतीमाल विक्री करु शकणार आहे. येथे नोंदणी केली म्हणजे त्याच बाजार समितीमध्ये शेती माल विक्री करावा असे नाही. शेतीमाल विक्री करण्यापूर्वी शेतकरी कोणत्याही बाजारपेठेतील दराची माहिती घेऊन माल विक्री करु शकणार आहे. मोदी सरकारने आतापर्यंत ‘ई-नाम’ अंतर्गत देशात 1000 मंडयांची भर घातली आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात सुमारे 2 हजार 700 कृषी उत्पादन बाजार समित्या आणि 4 हजार उप बाजार समित्या ह्या पोर्टलवर नोंद आहेत.

उद्देश काय आहे?

कृषी उत्पादनांसाठी ‘वन नेशन वन मार्केट’ सारखी यंत्रणा राबवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याअनुशंगाने योजनेचे काम सुरु आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली कृषी उत्पादने जवळच्या बाजारात ऑनलाइन विकू शकतो. तसेच व्यापारी शेतकऱ्यांना कोठूनही पैसे पाठवू शकतात. या माध्यमातून शेतकरी अनेक बाजारपेठा आणि अधिक खरेदीदारांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय राहणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून 150 कृषी उत्पादनांचा व्यवहार केला जात आहे. स्थापनेच्या वेळी केवळ 25 कृषी उत्पादनांचा व्यवहार झाला होता आता त्यामध्ये वाढ होत आहे.

किती शेतकऱ्यांचा आहे सहभाग?

या राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत शेतीमालाची गुणवत्ता चाचणीही करता येत आहे. त्यावरुनच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळणार आहे. शेतीमालाच्या दर्जानुसारच दर हे ठरविले जातात. सन 2016 ला योजनेला सुरवात झाली आणि 2017 पर्यंत केवळ 17 हजार शेतकरी जोडले गेले होते. परंतु आता यामध्ये 1 कोटी 71 लाख 99 हजार 63 शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. तर देशातील 1 लाख 98 हजार 924 व्यापारी आणि 99 हजार 260 कमिशन एजंट जोडले गेले आहेत. संपूर्ण देशातील शेतकरी यामध्ये जोडण्याचा मानस केंद्र सरकारचा असून त्या दृष्टीने काम सुरु आहे.

‘ई-नाम’ पोर्टल

शेतकऱ्यांना मोबाईलवरील play store मध्ये केवळ e-NAM असे नाव टाकून अॅप डाऊनलोड करायचे आहे. यानंतर आपण वापरत असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला ज्या पिकांची माहिती उपलब्ध करुन घ्यावयाची आहे ती पिके निवडायची आहेत. त्यानुसार नोंदणी करुन अॅपच्या मुखपृष्ठावर राज्य, जिल्हा हे निवडायचे असून त्यानंतर कृषी बाजार समितीची निवड करता येणार आहे. यामध्ये राज्यातीलच नव्हे तर देशातील बाजार समित्यांमध्ये एखाद्या पिकाचा काय दर सुरु आहे याची देखील माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे स्वातंत्र असणार आहे. शिवाय शेती मालही देण्यात आलेल्या माहिती भरुन विकता येणार आहे.

संबंधित बातम्या :

FRP : मराठवाड्यातील 13 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार, काय आहेत उच्च न्यायालयाचे आदेश?

… तर सोयाबीनचे भाव अजून वाढलील, गरज आहे एका निर्णयाची…!

बाजार समितीचा इशारा अन् कारवाईही, अनाधिकृत कापूस खरेदी व्यापाऱ्यांना भोवली