Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?

| Updated on: Jan 10, 2022 | 3:07 PM

नाशिक पाठोपाठ कांद्याची बाजारपेठ म्हणून सोलापूरची ओळख आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही सोयीची बाजारपेठ असल्याने वाहनांच्या रांगा कायम असतात. सध्या खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दरही स्थिर असल्याने रानातला कांदा थेट बाजारपेठेत दाखल केला जात आहे.

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?
भारत देशातून कांद्याची निर्यात वाढली आहे.
Follow us on

सोलापूर : नाशिक पाठोपाठ कांद्याची बाजारपेठ म्हणून सोलापूरची ओळख आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही सोयीची बाजारपेठ असल्याने वाहनांच्या रांगा कायम असतात. सध्या खरीप हंगामातील (Onion arrival) लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दरही स्थिर असल्याने रानातला कांदा थेट (Solapur Market) बाजारपेठेत दाखल केला जात आहे. पण एकाच दिवशी विक्रमी आवक झाल्याने कांदा दराचे गणितच बिघडले होते. सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर येथील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसापूर्वी 71 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे दरात 200 ते 250 रुपयांची घसरण झाली होती.

बाजार समितीमसोर 700 वाहने

सध्या खरीप हंगामातील कांद्याची काढणी कामे जोमात सुरु आहेत. कांद्याला दरही प्रमाणात असल्याने काढलेल्या कांद्याची लागलीच विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे शनिवारी येथील बाजार समितीमसोर तब्बल 700 वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांची गैरसोय तर झालीच पण आवक वाढल्याने 200 ते 250 रुपयांची घसरणही झाली होती. सोलापूर बाजार समितीमध्ये उस्मानाबाद, परंडा, पंढरपूर, माढा आदी भागातून कांद्याची आवक होत असते.

यामुळे झाली विक्रमी आवक

नववर्षाच्या पूर्वी येथील बाजार समितीमध्ये 30 ते 35 हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती. मात्र, आता नविन कांद्याची काढणी कामेही सुरु झाली आहेत. शिवाय सिध्देश्वर यात्रेमुळे बाजार समितीला सलग तीन दिवस सुट्टी होती. त्यामुळे शनिवारी अचानक आवक वाढली. दुपटीने आवक वाढल्याने दरातही घसरण झाली होती. त्यामुळे आज सोमवारी काय परस्थिती राहणार हे पहावे लागणार आहे. सर्वसाधारण 1700 रुपये क्विंटल असलेला कांदा थेट 1500 हजारावर येऊन ठेपला होता.

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती पण रविवारी रात्री उस्मानाबाद, परंडा, बार्शी भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. छाटणी केलला कांदा वावरातच होता. अचानक आलेल्या पावसामुळे पसरणीच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा निवाऱ्याला घेऊन जाताना शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

संबंधित बातम्या :

Success Story : 10 एकरातील ‘पिंक’ पेरुच्या लागवडीने उजाडली 25 लाखाच्या उत्पन्नाची ‘गुलाबी’ पहाट ; लॉकडाऊनचा असा हा सदउपयोग

खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..

कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!