Washim : निम्म्या क्षेत्रावरच खरिपाचा पेरा, आता कापसावरच शेतकऱ्यांची मदार

| Updated on: Jul 03, 2022 | 12:18 PM

गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार खरिपातील चित्र दिसत आहे. शिवाय कडधान्याच्या पेऱ्याला उशीर झाल्याने आता उडीद आणि मुगाच्या क्षेत्रावर आता कापूस लागवड होणार आहे. गतवर्षी कापसाला 14 हजार 500 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. शिवाय अजूनही कापसाचे दर हे टिकून आहेत.

Washim : निम्म्या क्षेत्रावरच खरिपाचा पेरा, आता कापसावरच शेतकऱ्यांची मदार
खरीप हंगामातील पेरणी
Follow us on

वाशिम : यंदा (Monsoon) मान्सून वेळीपूर्वी आणि सरासरीपेक्षा अधिक बरसणार यामुळे शेतकऱ्यांकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र, मान्सूनचे आगमन होऊन महिना उलटला तरी सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही. केवळ (Washim District) वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील चारही विभागामध्ये पावसाच्या लहरीपणाचा परिणाम (Kharif Season) खरीप पेरणीवर झालेला आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 57.10 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. असे असतानाही पेरले ते उगवले पण वाढलेच नाही अशी पिकांची अवस्था आहे. त्यामुळे दमदार पावसाने हजेरी लावली तरच खरिपातील पिके तरणार आहेत. पेरणीला विलंब झाल्याने यंदा उडीद, मुगाचे क्षेत्र घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा 4 लाख 424 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले होते. पण 2 लाख 31 हजार 770 हेक्टरावर पेरा झाला आहे.

विक्रमी दरामुळे कापसाच्या क्षेत्रात होणार वाढ

गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार खरिपातील चित्र दिसत आहे. शिवाय कडधान्याच्या पेऱ्याला उशीर झाल्याने आता उडीद आणि मुगाच्या क्षेत्रावर आता कापूस लागवड होणार आहे. गतवर्षी कापसाला 14 हजार 500 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. शिवाय अजूनही कापसाचे दर हे टिकून आहेत. त्यामुळे अजूनही उर्वरित काळात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी 19 हजार 245 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना 14 हजार 297 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी

वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात जूनच्या मध्यंतरानंतर पाऊस समाधानकारक झाल्याने पेरणीला वेग आला होता. त्यामुळे या तालुक्यात पेरणीचे प्रमाण सर्वाधिक 59.50 टक्के आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्यात 59.30 टक्के, मंगरुळपीर तालुक्यात 58.70 टक्के, कारंजात 56.70 टक्के, मानोरा तालुक्यात 55.20 टक्के, तर मालेगाव तालुक्यात 52.90 टक्के पेरणी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

परस्थितीनुसार पीकपेऱ्यात बदल

दरवर्षी हंगामाच्या सुरवातीला कडधान्याची पेरणी केली जाते. पण यंदा हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे तूर, उडीद, मूग या पिकांचा पेरा झालाच नाही. ही स्थिती सर्व राज्यभर राहिलेली आहे. त्यामुळे आता खरिपात सोयाबीन आणि कापसाच्या पेऱ्यात वाढ होईल असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी केली तरी उत्पादनात घट होणार नाही. त्यामुळे पेरणीची गडबड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.