ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका, अजितदादांच्या सूचना; हार्वेस्टर ताब्यात घेण्याचेही आदेश

| Updated on: Apr 07, 2022 | 6:34 PM

शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका, अजितदादांच्या सूचना; हार्वेस्टर ताब्यात घेण्याचेही आदेश
ऊस प्रश्नासंदर्भात अजित पवारांची महत्वाची बैठक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर (Sugar factory harvester) ताब्यात घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. तसेच ताब्यात घेतलेले हार्व्हेस्टर गळीत हंगाम सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांना भाडेतत्तावर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी आज दिले. हार्व्हेस्टर ताब्यात घेण्यासाठी साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात (Mantralaya) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हार्व्हेस्टर मशीन ताब्यात घ्या – अजित पवार

राज्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे ऊसतोड मजूरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन राज्यातील ज्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे, त्यांच्या हार्व्हेस्टर मशीन ताब्यात घेऊन ते हार्व्हेस्टर गळीत हंगाम सुरु असणाऱ्या कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्तांना दिले.

‘पुढील गळीत हंगामाचेही नियोजन करा’

राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. अतिरिक्त उसामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. पुढील वर्षीसुध्दा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुढील गळीत हंगामाचे सुध्दा योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

इतर बातम्या : 

‘राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ राऊतांच्या स्वागतावरुन राणेंचा खोचक सवाल

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’