Kharif Season : वाढीव बियाणे दरावर रामबाण उपाय, काय आहे कृषी विभागाचे आवाहन..?

| Updated on: Jun 11, 2022 | 9:43 AM

सध्या बाजारपेठेत रासायनिक खतांबरोबरच बी-बियाणांचा देखील पुरवठा झालेला आहे. असे असले तरी सोयाबीन बियाणांच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी 30 किलो सोयाबीनची बॅग 2 हजार 400 रुपयांना मिळत होती तर यंदा तीच बॅग 3 हजार 400 रुपयांना मिळत आहे. शिवाय कंपनीच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी ह्या कृषी विभागाकडे दाखल होतच आहेत.

Kharif Season : वाढीव बियाणे दरावर रामबाण उपाय, काय आहे कृषी विभागाचे आवाहन..?
सोयीबीन बियाणे
Follow us on

जालना : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शिवाय (Maharashtra) राज्यात आता (Monsoon) मान्सूनचेही आगमन झाल्याने पेरणीची लगीनघाई सुरु झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाबाबत शाश्वती नसली तरी खर्च हा ठरलेलाच आहे. पण खरिपासाठी होणाऱ्या खर्चात आता बचतीचा रामबाण उपाय कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील बियाणांपेक्षा घरगुती बियाणांवर लक्ष केंद्रीत केले तर खर्च टळणारच आहे शिवाय उत्पादनाबाबत खात्रीही राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गतवर्षी उत्पादित झालेले सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरावे असे आवाहन करण्यात आले आङहे. मात्र, घरगुती बियाणांचा वापर करताना त्याची उगवण क्षमता ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणेही तेवढेच गरजेचे आहे.

काय आहे बाजारातील चित्र..?

सध्या बाजारपेठेत रासायनिक खतांबरोबरच बी-बियाणांचा देखील पुरवठा झालेला आहे. असे असले तरी सोयाबीन बियाणांच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी 30 किलो सोयाबीनची बॅग 2 हजार 400 रुपयांना मिळत होती तर यंदा तीच बॅग 3 हजार 400 रुपयांना मिळत आहे. शिवाय कंपनीच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी ह्या कृषी विभागाकडे दाखल होतच आहेत. त्यामुळे महागडे बियाणे खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रथम कृषी विभागाच्या सल्ल्याने बियाणांची उगवण पाहून घरच्या बियाणावरच भर द्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ!

खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. शिवाय मराठवाड्यातच नव्हते तर राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या मुख्य पिकाचे उत्पादन घटले असले तरी यंदा क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अल्पावधीत अधिकचे उत्पादन आणि पीक जोपासण्याचा खर्चही कमी असे सोयाबीनचे वैशिष्ट असून गेल्या 4 वर्षापासून राज्यात पेरा वाढत आहे. यंदा 50 लाख हेक्टरावरुन अधिकच्या क्षेत्रावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाणार आहे. मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातच सोयाबीन अधिक प्रमाणात घेतले जात आहे.

हे सुद्धा वाचा

घरच्या बियाणांचा असा करा वापर

घरचे बियाणे शेतकऱ्यांसाठी नवखे वाटत असले तरी त्याची उगवण क्षमता तपासणीनंतर शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षीचे बियाणे साठवूण ठेवले आहे त्यांनी कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून त्याची तपासणी करुन घ्यावयाची आहे. त्यानंतर आपल्याच गावातील शेतकऱ्यांना ते बियाणे द्यायचे आहे. त्यामुळे काही अडचण आली तरी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार सर्वच शेतकऱ्यांची अडचण सोडविता येणार आहे.