Ravindra Tupkar : राज्याचे प्रतिनिधित्व कोणीही करा, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका

| Updated on: Jul 02, 2022 | 11:33 AM

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच खत-बियाणांचा तुटवडा होतो. त्यामुळे पेरणी सुरु होईपर्यंत हा पुरवठा जिल्हा निहाय होणे गरजेचे होते. पण सरकारचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींनीच वेधले गेले तर शेतकरी हा वाऱ्यावर सोडला गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी कृत्रिम खत टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला तर अनेक शेतकऱ्यांना अधिकच्या दराने खत घ्यावे लागत आहे.

Ravindra Tupkar : राज्याचे प्रतिनिधित्व कोणीही करा, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Politics) राज्यात राजकीय नाट्य सुरु होते. आता चित्र स्पष्ट झाले असले तरी प्रतिनिधित्व कोण करणार हा प्रश्न कायम आहे. शपथविधी पार पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यानंतर हा प्रश्न अधिक गडद झाला आहे. असे असले तरी सध्या खरीप हंगाम सुरु झाला असतानाही सरकारला याचे गांभिर्य राहिलेले नाही. त्यामुळे राज्याचे प्रतिनिधित्व कोणीही करा पण जगाच्या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडू नका अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Ravindra Tupkar) रवींद्र तुपकर यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट (Kharif Production) खरीप उत्पादनावर देकील होईल अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजकारणावर अधिकचा वेळ खर्ची न करता शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

खत, बियाणांचा प्रश्न कायम

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच खत-बियाणांचा तुटवडा होतो. त्यामुळे पेरणी सुरु होईपर्यंत हा पुरवठा जिल्हा निहाय होणे गरजेचे होते. पण सरकारचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींनीच वेधले गेले तर शेतकरी हा वाऱ्यावर सोडला गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी कृत्रिम खत टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला तर अनेक शेतकऱ्यांना अधिकच्या दराने खत घ्यावे लागे आहे. कच्च्या मालाचा पुरवठाच झाला नसल्याने टंचाई होणार निश्चित मानले जात होते. अशा स्थितीमध्येही राज्य सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

पीक कर्जाबाबतही उदासिनता

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशाची गरज निर्माण होऊ नयेन म्हणून पीक कर्ज योजना राबवली जाते. पण याबाबत योग्य ती जनजागृती न झाल्यामुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्या कर्जाचेही वाटप झालेले नाही. राज्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपाबाबत योग्य भूमिका घेतली आहे. राष्ट्रीयकृत बॅंकाकडून मात्र, राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचा उद्देश तर साध्य झाला नाहीच पण शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

सध्याच्या राजकीय घडामोडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास राजकीय नेत्यांना वेळ नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करुन घेतला जात असल्याचा आरोप रवींद्र तुपकर यांनी केला. सध्या शेती उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा काळ असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी जाणून घेत नाही. त्यामुळे राज्याचे प्रतिनिधित्व कोणीही करा पण जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.