Export Data : एवढं मोठं संकट असूनही भारतीय उद्योग क्षेत्राची कमाल, करुन दाखवलं, एक मोठी Good News
Export Data : सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे. डॉलर समोर रोज रुपया तुटतोय. परकीय चलनाची गंगाजळी घटत आहे. मात्र या परिस्थितीतही भारतीय उद्योग क्षेत्राने कमाल केली आहे. आकडेच याचा उत्तम पुरावा आहेत.

अमेरिका-इराण युद्ध आता थांबलं असलं तरी त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची अमेरिका-इराण दोघांनी चालवलेली नाकाबंदी हे तेलाच्या किंमती भडकण्यामागचं मुख्य कारण आहे. ही अशी परिस्थिती कधीपर्यंत संपले याचं उत्तर कोणाकडेच नाहीय. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं. वर्षभर सोनं खरेदी करु नका असं सांगितलं. कारण त्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करावं लागत असून त्यामुळे रुपया ढासळतोय. अर्थव्यवस्थेवर दबाव वाढतोय. केंद्र सरकारने अखेर काल प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. ही दरवाढ होताच अन्य वस्तुंचेही भाव वाढले असून महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे.
पेट्रोल-डिझेलमुळे फक्त भारतातच नाही, सगळ्या जगात संकट निर्माण झालं आहे. मात्र, या परिस्थितीतही भारत योग्य ट्रॅकवर आहे. याचं ताजं उदहारण म्हणजे देशाच्या निर्यातीचे आकडे. अनेक आव्हानं असूनही भारतीय सामानाची निर्यात एप्रिल महिन्यात वाढून 43.56 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. आयातीमध्ये सुद्धा वाढ झालीय, यात दुमत नाही. एकूण निर्यातीबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा 80.80 अब्ज डॉलर आहे. जागतिक आव्हान असूनही देशाची निर्यात वाढत आहे असं कॉमर्स सेक्रेटरी राजेश अग्रवाल म्हणाले.एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये 13.78 टक्के वाढ होऊन 43.56 अब्ज डॉलर पर्यंत आकडा पोहोचला आहे. त्याशिवाय एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर आयातीत 10 टक्के वाढ होऊन 71.94 अब्ज डॉलर झाली आहे.
भारताची कुठल्या क्षेत्रात निर्यात वाढली?
अनेक क्षेत्रात निर्यातीमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. धान्याच्या निर्यातीत सर्वाधिक 210.19% वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर मीट, डेयरी आणि पोल्ट्री उत्पादनात 48.03% आणि इलेक्ट्रॉनिक सामानात 40.31% वाढ दिसून आलीय. पेट्रोलियम प्रोडक्ट, हस्तशिल्प, मरीन प्रोडक्ट, इंजीनियरिंग सामान, औषधं आणि कॉफी मध्ये वाढ पहायला मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ हल्ला असो किंवा अमेरिका-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेलं तेल-गॅस संकट मोदी सरकारचा प्लान बी चालतोय. त्याचा परिणामही दिसतोय हे आयात-निर्यातीच्या ताज्या आकड्यावरुन स्पष्ट होतं.
भारताला व्यापारी तोटा किती झाला?
एप्रिल महिन्यात भारताला 28.38 अब्ज डॉलरचा व्यापारी तोटा झाला. हॉर्मुज संकटामुळे मागच्या महिन्यात भारतातून पश्चिम आशियाला होणाऱ्या निर्यातीत 28 टक्के घट झाली. 4.16 अब्ज डॉलरची निर्यात झाली. एप्रिल 2025 मध्ये याच महिन्यात हा आकडा 5.78 अब्ज डॉलर होता. या क्षेत्रातून होणारी आयात एप्रिल महिन्यात 31.64 टक्के घटली.