Wipro Share | एक खेडं न्यारं, तिथं शेअरचं वारं, या शेअरमुळे हे गाव झालं तब्बल 7000 कोटींचे मालक!

| Updated on: Jul 28, 2022 | 10:51 AM

Wipro Share | तुम्ही म्हणाल खेड्यात कुठं आलीया सुबत्ता अन् लक्ष्मी. तर मंडळी सगळीच खेडी काही गरीब नसत्यात, महाराष्ट्रातील एक असं गाव आहे जे, तब्बल 7000 कोटींचे मालक आहे.

Wipro Share | एक खेडं न्यारं, तिथं शेअरचं वारं, या शेअरमुळे हे गाव झालं तब्बल 7000 कोटींचे मालक!
अमळनेर कोट्यधीश
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Wipro Share | देशातील अनेकी खेडी (Village) आजही गरिब, अशिक्षितपणा, सोयी-सुविधांशी झगडत आहेत. शेअर बाजार तर कशाशी खातात हे काही गावांच्या नावालाही नाही. पण राज्यातील असंच एक गाव आहे, जे थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 7000 कोटींचे मालक आहे. जळगाव जिल्हा (Jalgaon District) केळीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील जैन उद्योग समुहही जगभरात नावाजलेला आहे. असाच एक प्रयोग 75 वर्षांपूर्वी जिल्ह्यातील अमळनेर येथे झाला होता. आता जगभरात नावाजलेल्या विप्रो (Wipro) ब्रँडची स्थापना अमळनेरमध्ये झाली होती. बडे उद्योजक अझीम प्रेमजी (Azim Premji) यांच्या वडिलांनी अमळनेरमध्ये ‘डालडा’ (Dalda) या विख्यात ब्रँडचे उत्पादन सुरु केले होते. या ब्रँडच्या पुण्याईने अमळनेरकर (Amlner) कोट्यधीश झाले आहेत. हा इतिहास अनेकाना अज्ञात आहे. अझीम प्रेमजी अजूनही अमळनेरकरांच्या संपर्कात आहेत. छोट्या आणि मोठ्या गुंतवणुकीतून या गावात अनेक जण श्रीमंत झाले आहेत. आता अमळनेरकर एवढे श्रीमंत कसे झाले याची रंजक कथा आपण बघणार आहोत.

अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हुसेन हशन प्रेमजी यांनी अमळनेरमध्ये स्वातंत्र्यानंतर लागलीच वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. त्यांच्या डालडा तुपाने त्यावेळी क्रांती केली. पिवळ्या रंगाचे डबे आणि त्यावर निळ्या रंगाचे सूर्यफुलाचे चित्राचे डालडा तुपाचे डबे अनेकांच्या घरात आजही सापडतील. हे डबे कधीकाळी स्वंयपाक घराची शान होते. अमळनेर परिसरात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन अधिक होत असल्याने त्याचा वापर करण्यात येत होता.

हे सुद्धा वाचा

गावाकऱ्यांना दिले शेअर

29 डिसेंबर 1945 रोजी वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि स्वातंत्र्यानंतर तिचे उत्पादन सुरु झाले. विप्रोचे सर्वसामान्य जनतेकडे 15.37 टक्के शेअर्स आहेत. त्यातील अवघे 3 टक्के शेअर अमळनेरमध्ये आहे आणि या 3 टक्के शेअर्सनेच अमळनेरकरांना तब्बल 7 हजार 600 कोटींचे मालक केले आहे. अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे, इथे रस्त्यावरुन पायी जाणारा एखादा व्यक्तीही करोडपती असू शकतो. कारण त्याच्या आजोबाने केलेली गुंतवणूक आज त्याच्यासाठी कमालीची फायदेशीर ठरली आहे. मोहम्मद हुसेन हशन प्रेमजी यांनी फॅक्टरी टाकली तेव्हा त्यांची कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सुचीबद्ध (Listed) केली होती. त्यांनी कंपनीतच काम करणाऱ्या कामगारांना आणि स्थानिकांना यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार ज्यांनी गुंतवणूक केली. ते आज मालामाल झाले आहे. त्याकाळी शेअरची किंमत 100 रुपये होती. ही किंमत खूप जास्त होती. पण अनेकांनी त्यावेळी गुंतवणूक केली, आज हे शेअर्सधारक आज प्रचंड श्रीमंत झाले आहेत.