महाराष्ट्रासह 3 राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची BVG मार्फत सेवा, कोण आहेत हणमंतराव गायकवाड?

| Updated on: Aug 19, 2021 | 8:08 AM

अत्यंत हलाखीत दिवस काढलेल्या हणमंतरावांनी कष्टाचं चीज करून मोठा व्यवसाय उभा केलाय. विशेष म्हणजे त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामं केलीत. हणमंतरावांनी स्थापन केलेल्या 'भारत विकास ग्रुप' कंपनीने अनेक समाजोपयोगी कामे केलीत.

महाराष्ट्रासह 3 राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची BVG मार्फत सेवा, कोण आहेत हणमंतराव गायकवाड?
hanmant gaikwad
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राच्या मातीतून अनेक रत्न घडलीत. अनेकांनी महाराष्ट्राचा नावलौलिक देशभरात वाढवला. अशाच पद्धतीनं सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा रहिवासी असलेल्या मराठमोळ्या हणमंतराव गायकवाडांनीही इच्छाशक्तीच्या जोरदार यशस्वी उद्योजक होऊन दाखवलंय. अत्यंत हलाखीत दिवस काढलेल्या हणमंतरावांनी कष्टाचं चीज करून मोठा व्यवसाय उभा केलाय. विशेष म्हणजे त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामं केलीत. हणमंतरावांनी स्थापन केलेल्या ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीने अनेक समाजोपयोगी कामे केलीत.

जाणून घेऊयात हणमंतरावांचा जीवन प्रवास

सातारा जिल्ह्यातील रहिमतपुरात एका गरीब कुटुंबात जन्मलेले हणमंतराव आज यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. हणमंतराव यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण रहिमपुरातच झालंय. पाचवी इयत्तेत शिकण्यासाठी त्यावेळी कुटुंबानं पुण्यात स्थलांतर केले आणि ते एका छोट्याशा खोलीत राहू लागले. पुण्यातल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर पायी दोन दोन प्रवास करत ते शाळा गाठायचे. तरीही त्यांनी शाळेत पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश मिळवला. जेवायला पैसे नसलेल्या हणमंतरावांना तिथल्या शिक्षकांनीही मोठी मदत केली.

कचऱ्यातून मोठा पैसा कमावण्याची लढवली शक्कल

पैसे कमावण्यासाठी ते घरांची रंगकामे करणे, शिकवण्या घेण्यासारखी कामे करू लागले. त्यानंतर त्यांना टेल्को कंपनीत नोकरीची संधी मिळाली. टेल्कोत कचऱ्यात फेकलेल्या तांब्याच्या तारांवर पुनर्प्रयोग करून त्यांनी त्या वापरात आणल्या. अशा पद्धतीनं त्यांनी कंपनीचे जवळपास अडीच कोटी रुपये वाचवले. कंपनीतल्या कचऱ्यातून मोठा पैसा कमावता येऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कंपनीला राम राम ठोकत ‘भारत विकास ग्रुप कंपनी’ स्थापना केली. तसेच त्यांच्याच कंपनीतील मित्र उमेशनंही या कामात त्यांना मदतीचा हात दिला.

जरंडेश्वर साखर कारखाना तीन वर्षे चालवायला घेतला

अल्पावधीतच भारत विकास ग्रुपनं मोठी प्रसिद्धी मिळवलीय. कुर्ल्याची फियाट कंपनी पुण्याजवळ रांजणगावला हलवून परत उभारण्याचं कंत्राट भारत विकासला मिळालं. तसेच 8 हजार ट्रक लावून ते काम त्यांनी यशस्वीसुद्धा केले. विशेष म्हणजे हणमंतरावांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना तीन वर्षे चालवायला घेतला होता; पण त्यांना तो काही चालवायला जमला नाही.

महाराष्ट्रासह तीन राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची सेवा सुरू

त्यानंतर त्यांना थेट लोकसभेच्या लायब्ररीच्या सफाईचं काम मिळालं. भारत विकास ग्रुप कंपनीनं ते कामही फत्ते केले. हाऊस किपिंगशिवाय BVG ने विविध क्षेत्रात व्यवसाय वाढवला. यामध्ये आरोग्य आणि कृषी क्षेत्राचा विशेष उल्लेख करावा लागेल. हणमंतरावांच्या भारत विकासनं महाराष्ट्रासह तीन राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची सेवा सुरू केली. 108 या क्रमांकावर फोन केल्यास 20 मिनिटांत रुग्णवाहिका मिळण्याची सोय करण्यात आली.

‘बीव्हीजी’ कंपनीत आज लाखांहून अधिक लोक कार्यरत

हणमंतरावांच्या ‘बीव्हीजी’ कंपनीत आज लाखांहून अधिक लोक काम करतात, विशेष म्हणजे त्यांना माणसे जोडण्याची एक चांगली कला अवगत आहे. ते नेहमीच कर्मचाऱ्यांच्या दुःखात सहभागी असतात. तसेच कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदतही करतात.

शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा मानस

महत्त्वाचे म्हणजे हणमंत गायकवाड यांचं काम केवळ हाऊस किपिंग आणि आरोग्य सेवांपर्यंत त्यांनी मर्यादित ठेवले नाही. त्यांनी शेतीतही अनेक प्रयोग केले, शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचं पावलं उचलली. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्याला फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट्ट करून दाखवलं. इस्रायलसारख्या शेतीचा प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी करावे, यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांच्या संस्थेने बियाणांपासून ते पोषक आणि रासायनिक नसलेली कृषी औषधांची निर्मिती केली.

संबंधित बातम्या

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी 11 हजार कोटींच्या नव्या घोषणेच्या तयारीत, मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून ‘या’ सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

BVG service of 1700 ambulances in 3 states including Maharashtra, who is Hanamantrao Gaikwad?