
आपल्या आयुष्याची घडण आणि मूल्ये घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांचे उद्योगपती गौतम अदानी यांनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्मरण केले आहे. अदानी यांनी या महिलांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असे संबोधले आहे. लिंक्डइनवर भावनिक पोस्ट शेअर करत अदानी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील महिलांचा त्यांच्या आयुष्यावर अतिशय खोल प्रभाव पडला आहे. जीवन, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीबाबत नवी दृष्टी देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक मुलासाठी आईच पहिली गुरू असते. त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्यासाठीही त्यांची आईच पहिली शिक्षिका होती. त्यांच्या आईचा प्रभाव त्यांच्या आयुष्यात कायम राहिला आहे. लहानपणी त्यांनी आईकडून भारतातील पुराणकथा ऐकत मोठे झाले. अदानी म्हणतात की, त्या कथा पाठ्यपुस्तकांपेक्षा खूप मोठी मूल्ये देणाऱ्या होत्या. धैर्य, त्याग, कर्तव्य आणि विश्वास यांची बीजे त्यांच्या मनात पेरणाऱ्या या कथा असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त 16 व्या वर्षी स्वतः काहीतरी साध्य करण्याच्या इच्छेने त्यांनी घर सोडून मुंबई गाठली. अशा अनिश्चित भविष्याच्या दिशेने मुलाला पाठवण्यासाठी त्यांच्या आईमध्ये किती धैर्य असावे, असा प्रश्नही अदानी यांनी उपस्थित केला.
गौतम अदानी यांनी आपल्या पत्नी प्रीती अदानी यांच्याबाबत बोलताना माझ्या अंतःकरणाची राखण करणारी असे विधान केले आहे. दंतवैद्य असलेल्या प्रीती अदानी यांनी अदानी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, शाश्वत उपजीविका आणि समुदाय विकास अशा क्षेत्रांत 22 राज्यांमध्ये काम करून कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे.
गौतम अदानी यांनी आपल्या दोन सुना, परिधी आणि दिवा यांचाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरव केला. दोघींनीही कुटुंबात नवा दृष्टिकोन आणल्याचे त्यांनी सांगितले. परिधी या वकील आहेत, तर दिवा या डिझायनर असून विशेष गरज असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी काम करतात.
आपल्या तीन नातींमुळे मिळणारा आनंदही अदानी यांनी सांगितला. छोट्या मुलींमुळे कामाचा ताणही कमी होतो, असे त्यांनी सांगितले. ‘एखादा पुरुष आपले आयुष्य बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प आणि व्यवसाय उभारण्यात घालवतो. पण जेव्हा एक लहान नात त्याच्या मांडीवर येऊन पूर्ण विश्वासाने त्याच्याकडे पाहते, तेव्हा तो पुरुष हे सगळं का उभारत आहे याचं खरं उत्तर त्याला मिळतं,’ असे अदानी यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले.
शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले की, ‘जीवनाची सर्वात मजबूत पायाभरणी स्टील किंवा काँक्रीटने होत नाही. आपल्याला घडवणारे लोकच ही पायाभरणी करतात. माझ्या प्रवासाला जर जगाने कधी आठवले, तर ते यासाठीच असेल,’ असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली.