नोटा बदलणार, अखेर सरकारने दिली मंजूरी; RBI कडून मोठी अपडेट काय?
Plastic Currency Notes : लवकरच बाजारात 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

देशातील चलनी नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच बाजारात 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 10 आणि 20 च्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा प्रायोगिक चाचणीसाठी छापण्यात येणार आहेत. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अर्थ मंत्रालयाकडून परवानगी
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, अर्थ मंत्रालयाने RBI च्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या हा केवळ एक पायलट प्रकल्प आहे. भारतातील हवामान आणि विविध परिस्थितींमध्ये प्लास्टिकच्या नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात, याची चाचणी घेण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
अनेक देशांमध्ये प्लास्टिक नोटांचा वापर
RBI च्या मते, पॉलिमर नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत असून त्यांचे आयुष्यही जास्त आहे. अनेक देशांमध्ये आधीपासूनच प्लास्टिकच्या नोटांचा वापर केला जात आहे, याचे सकारात्मक देखील परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे भारतही आता या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे.
कागदी नोटा बंद होणार नाहीत
भारतीय बाजारात प्लास्टिकच्या नोटा आल्या तरी कागदी नोटा बंद केल्या जाणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे. ट्रायल यशस्वी झाल्यास पॉलिमर आणि कागदी अशा दोन्ही प्रकारच्या नोटा एकाच वेळी चलनात राहणार आहेत.
डिजिटल पेमेंटवर काय परिणाम होणार?
सरकारने हेही स्पष्ट केले की, प्लास्टिकच्या नोटा बाजारात आल्यावर डिजिटल पेमेंटवर काय परिणाम होईल, याबाबत आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या नोटा नियमितपणे सर्वसामान्यांच्या वापरात आल्यानंतरच त्याचा परिणाम स्पष्ट होईल. RBI चे म्हणणे आहे की रोख व्यवहार आणि डिजिटल पेमेंट हे एकमेकांचे पूरक आहेत. भविष्यातही UPI, कार्ड, ऑनलाइन पेमेंट यांसोबतच रोख व्यवहारालाही तितकेच महत्त्व राहणार आहे.
दरम्यान, प्लास्टिकच्या नोटांची चाचणी यशस्वी झाल्यास भारताच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल होऊ शकतो. प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असल्याने त्या लवकर खराब होणार नाहीत. त्यामुळे नवीन नोटा छापण्याचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे.