Happy Birthday Mukesh Ambani : आशियातील धनकुबेर होणे नव्हते सोपे; पण मुकेश अंबानी यांनी अशी केली कमाल

Mukesh Ambani यांनी 18 व्या वर्षीच वडिलांसोबत रिलायन्स समूहाचे कामकाज सांभाळायला सुरुवात केली होती. 1981 पासूनच त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळायला सुरुवात केली होती. आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या या यशस्वी प्रवासाची ही माहिती...

Happy Birthday Mukesh Ambani : आशियातील धनकुबेर होणे नव्हते सोपे; पण मुकेश अंबानी यांनी अशी केली कमाल
हॅप्पी बर्थडे मुकेश अंबानी
| Updated on: Apr 19, 2024 | 9:28 AM

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. मुकेश अंबानी आता 66 वर्षांचे झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. वडील धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेली रिलायन्स इंडस्ट्रीज आज त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली आहे. आता तीचा पसारा विस्तारला आहे. ही भविष्यातील कंपनी ठरली आहे. जाणून घेऊयात अंबानी यांची ही यशोगाथा…

तरुणपणीच रिलायन्सचा भाग

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 18 व्या वर्षीच रिलायन्सचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती. 1981 पासून ते रिलायन्समध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज हे नावच या समूहाने 1985 मध्ये स्वीकारले होते. भविष्यातील रणनीती ठरविण्यात मुकेश अंबानी यांचा हातखंड असल्याचे म्हटले जाते.

रिलायन्सच्या कामाचे स्वरुपच बदलवले

  1. मुकेश अंबानी यांच्यापूर्वी रिलायन्स टेक्सटाईल आणि केमिकल्स क्षेत्रात अग्रेसर होती. पण मोठा उद्योग समूह व्हायचे असेल तर केवळ दोन क्षेत्रावर कसं भागणार? या विचाराने मुकेश अंबानी यांना पछाडलं. ते स्वतः केमिकल इंजिनिअर होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शिक्षण त्यांना अर्ध्यावरच सोडून परताव लागलं होते. त्यांनी रिलायन्समध्ये मोठे बदल घडवून आणले. त्यांनी पेट्रोकेमिकल क्षेत्राची सुरुवात केली.
  2. धीरुभाई यांच्यासोबत अनेक वर्ष काम केल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर येथील रिफायनरीला मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी केले. त्यांनी भविष्याची पावलं ओळखली. दूरसंचार क्षेत्रात आता उतरण्याची योग्य वेळ हेरली आणि रिलायन्स कम्युनिकेशनची सुरुवात झाली.

टेलिकॉमचे स्वप्न गेले भावाकडे

  • धीरुभाई अंबानी यांच्या निधानाने मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला. त्यानंतर लहान भाऊ अनिल अंबानी यांच्या सोबत उद्योगात वाटाण्या झाल्या. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, टेलिकॉमचा व्यवसाय त्यांना भावासाठी सोडावा लागला.
  • वाटाघाटीत रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनी अनिल अंबानी यांच्या खात्यात गेली. इतकेच नाही तर पुढील 10 वर्षे मुकेश अंबानी या क्षेत्रात उतरणार नाहीत, असा करार पण करावा लागला. मुकेश अंबानी योग्य वेळीची वाट पाहत राहिले. शेवटी 2016 मध्ये त्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटले. रिलायन्स जिओ बाजारात उतरली.

आज रिलायन्सन घेतली भरारी

मुकेश अंबानी आज आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी आयुष्यातील 20 वर्षे खर्ची घातली. रिलायन्स आता केवळ पेट्रोकेमिकल पूरतीच मर्यादीत राहिली नाही तर टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात तिने मोठी झेप घेतली आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रात पण कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. ग्रीन एनर्जी, अक्षय ऊर्जा क्षेत्रात पण कंपनीने मोठी योजना आखली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us