
रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. रशियाची उर्जा क्षेत्रातील कंपनी रोसनेफ्ट भारतातील नायरा एनर्जीमधील आपली भागेदारी विकणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यासाठी चर्चा सुरु केली आहे. नायरा एनर्जीमधील भागेदारी घेण्यासाठी यापूर्वी अनेक भारतीय कंपन्यांनी चर्चा सुरु केली होती. परंतु जास्त किंमतीमुळे कोणत्याही कंपनीने त्यासाठी सर दाखवला नाही. आता रिलायन्स आणि रोझनेफ्ट यांच्यात सुरुवातीची चर्चा सुरू झाली आहे. ही बोलणी अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. रोझनेफ्ट त्यांच्या भागभांडवलासाठी २० अब्ज डॉलर्सची मागणी करत होता. इतक्या जास्त किंमतीमुळे अनेक कंपन्यांनी यापूर्वी भागेदारी घेण्यास नकार दिला होता. यामुळे रोझनेफ्टने आपली मागणी कमी करत १७ अब्ज डॉलर केली आहे.
रिलायन्स आणि रोझनेफ्ट यांच्यात करार झाला तर रिलायन्स भारतातील सर्वात मोठी रिफायनरी कंपनी बनणार आहे. इंडियन ऑईल कंपनीला रिलायन्स मागे टाकणार आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी चालवते. त्याची क्षमता प्रति वर्ष ६८ दशलक्ष टन आहे. नायराच्या अधिग्रहणामुळे रिलायन्सची क्षमता दरवर्षी २० दशलक्ष टनांनी वाढणार आहे. इंडियन ऑईलची ८०.७ दशलक्ष टन क्षमता आहे. करारानंतर रिलायन्सची क्षमता इंडियन आईलपेक्षा जास्त होणार आहे. रिलायन्सचा बाजारात दबदबा वाढणार आहे. रिलायन्सला ६,७५० पेट्रोल पंप मिळणार आहे. सध्या रिलायन्सकडे १७०० पेट्रोल पंप आहे.
गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या इंधन रिटेल ब्रँड जिओ-बीपी आणि अदानी-टोटल गॅस यांच्यात एक करार झाला. या करारांतर्गत दोन्ही कंपन्या एकमेकांच्या आउटलेटमधून त्यांचे संबंधित इंधन विकणार आहे. हा करार नायराच्या अधिग्रहण योजनेचा भाग असण्याची शक्यता आहे. रोझनेफ्टने अदानी ग्रुपलाही ही ऑफर दिली होती. परंतु अदानी ग्रुपने ती ऑफर नाकारली.
रिलायन्सने नायराचे अधिग्रहण केले तर जिओ-बीपी करारातून त्यांना इंधन विक्रीसाठी आउटलेट मिळतील. त्याच वेळी अदानी-टोटल गॅसच्या सीएनजी व्यवसायाला नायराच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे या कराराकडे उद्योग जगाचे लक्ष लागले आहे.