पुण्यातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देणार का? सुनेत्रा पवार समोर असतानाच मुख्यमंत्री म्हणाले….
पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीनुसार या पुलाला 'अजित पवार' यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर प्रचंड त्रस्त झाले होते. याच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नाव देण्यास संमती दर्शवली आहे.
नेमकं काय घडलं?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपुलाचे नुकतंच उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली. या उड्डाणपुलाची संकल्पना आणि त्याचा पाठपुरावा अजित दादांनी अतिशय आक्रमकपणे केला होता. विद्यापीठ चौकातील हा पूल त्यांच्याच दूरदृष्टीतून आकाराला आला आहे. त्यामुळे या पुलाला अजित पवारांचे नाव देण्यात यावे ही सर्वांची इच्छा आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. ते म्हणाले, “अजित दादांनी हा पूल उभारण्यासाठी प्रचंड पुढाकार घेतला होता. जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा धाडसी निर्णय त्यांनीच घेतला. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम पूर्ण केले. हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असून आधुनिकतेला शोभणारा आहे. त्यामुळे या पुलाला अजित दादांचे नाव देण्यास माझे पूर्ण समर्थन असून आम्ही निश्चितपणे त्यांचे नाव देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्याचा विकास करताना बेंगळुरू सारखी परिस्थिती ओढवू नये, यासाठी रिंग रोड आणि भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी अजित दादांनी सातत्याने भूमिका घेतली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी भावूक झाल्या. हा पूल पाडण्याचा आणि पुन्हा नव्याने बांधण्याचा धाडसी निर्णय घेताना दादांनी पुणेकरांच्या हितासाठी अनेकदा वाईटपणा पत्करला. पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी ते स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते. आज हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. दादांनी पुण्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी पुणेकरांना दिले.
यावेळी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उड्डाणपुलाच्या कामाच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला. जेव्हा मी पुलाच्या कामासाठी दादांना भेटलो, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, पूल पाडा पण काम लवकर पूर्ण करा, कारण मला रात्रीची शांत झोप लागायला हवी. त्यांच्या या तळमळीमुळेच आज हा पूल पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. तसेच आमदार माधुरी मिसाळ यांनीही सुनेत्रा पवार यांचे कौतुक करत म्हटले की, अजित दादांचा विकासकामांचा वसा सुनेत्रा वहिनींनी समर्थपणे पुढे चालवला आहे.
दरम्यान पुण्यातील या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलामुळे आणि मेट्रो मार्गिकेमुळे बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ रस्त्यावरील सिग्नलचा ताण कमी होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या पुलाचे लोकार्पण झाल्याने पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
