सर्वात जास्त लांबीचं भाषण, पण दूरदृष्टीचा अभाव : शरद पवार

| Updated on: Feb 01, 2020 | 5:27 PM

अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर दृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे, असे शरद पवार (Sharad Pawar on Budget 2020) म्हणाले.

सर्वात जास्त लांबीचं भाषण, पण दूरदृष्टीचा अभाव : शरद पवार
Follow us on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर (Sharad Pawar on Budget 2020) केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया मांडली. अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर दृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे, असे शरद पवार म्हणाले.

“मोदी सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे. बेरोजगारीच्या प्रश्नाकडेही योग्य प्रकारे लक्ष दिलेले नाही. हे सर्वात लांब भाषण होते. पण त्यात दूरदृष्टी आणि दिशांचा अभाव होता,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

“या अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रित केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाबाबत दृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे. हे अजूनही एक दूरचे स्वप्न आहे,” असेही शरद पवार (Sharad Pawar on Budget 2020) म्हणाले.

सीतारमण यांनी भाषण अर्धवट सोडलं, तरी ठरलं बजेटच्या इतिहासातील सर्वाधिक लांबीचं!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं (Longest Budget Speech Nirmala Sitharaman) ठरलं आहे. सीतारमण यांनी तब्बल 159 मिनिटांचं म्हणजेच दोन तास 39 मिनिटांचं भाषण केलं. विशेष म्हणजे सीतारमण यांनी गेल्या वर्षी रचलेला स्वतःचाच विक्रम मोडित काढला.

मोदी सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये सध्या एखादी बँक बुडाली, तर सरकार तिच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये देते. पण ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेवर पाच लाख रुपयांची विमा हमी दिली जाईल. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी चांगली यंत्रणा तयार केली जात असल्याचंही सीतारमण यांनी अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणं आवश्यक असल्याचं अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केलं (FM Nirmala Sitaraman on age of become mother). यावर अभ्यास करण्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एका टास्क फोर्सचीही घोषणा केली.

केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेला जनतेनं चांगला पाठिंबा दिला आहे. या योजनेमुळे मुलगी-मुलगा गुणोत्तरात सुधारणा झाली. 10 कोटी कुटुंबांना पोषण आहाराची माहिती देण्यात आली आहे. 6 लाखहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन देण्यात आला आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद (Sharad Pawar on Budget 2020) केलं.