जिभेची चव जाणार, आयुष्य अळणी होणार! 30% उत्पादन घटल्याने मीठ महाग होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, जर मान्सून जूनच्या पहिल्या पंधारवाड्यात दाखल झाला तर मीठाच्या उत्पादनात घट होईल. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला होता. यावेळी लवकर पाऊसाची शक्यता लक्षात घेत, त्याचा मीठाच्या उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येणार आहे.

जिभेची चव जाणार, आयुष्य अळणी होणार! 30% उत्पादन घटल्याने मीठ महाग होण्याची शक्यता
मिठाबाबत मोठी बातमी
Image Credit source: TV9
| Updated on: May 13, 2022 | 10:02 AM

महागाईने (Inflation) गरिबांच्या ताटातून अगोदरच अन्न आणि भाज्या पळविल्या आहेत. देशातील गरिबांना एकवेळच्या जेवणाची तजवीज करणे जिकरीचे झाले आहे. आता त्यांच्याकडे पूर्वी गरीब लोक खायचे तसे मीठासोबत भाकरी खायची वेळ आली आहे. पण इथे ही नशिबाने त्यांची थट्टा केली आहे. महागाईची मीठावर वक्रदृष्टी पडली आहे. येत्या काही दिवसांत मीठ गरिबांसाठी बेचव होणार आहे. मीठाचे भाव (Salt price hike) वाढल्याने अनेकांच्या घरातील स्वयंपाक आळणी होणार आहे. बातमी अशी आहे की, देशातील मीठाचे उत्पादन (Production reduce) 30 टक्क्यांनी घसरणार आहे. यामागची कारणमीमांसा समजून घेऊयात. देशात सर्वात जास्त मीठाचे उत्पादन होते ते गुजरात राज्यात. यंदा मान्सून लवकर येणार आहे, तर गेल्यावर्षी तो खूप लांबला होता. त्यामुळे उत्पादनाचा कालावधी खूप कमी उरला आहे. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. उत्पादन घटले तर सहाजिकच मीठाच्या किंमती वाढतील. त्यामुळे वाढत्या महागाईला मीठाचा तडका लागणार आहे.

खरं पाहता, गुजरात राज्यात मीठाचे उत्पादन दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु होते. मात्र मान्सूनने हात दिल्याने गेल्यावर्षी मीठाचे उत्पादनाला ही उशीर झाला. समुद्र किनारी क्षेत्रावर यंदा एप्रिल महिन्यांच्या मध्यात उत्पादन सुरु झाले. त्यामुळे उत्पादनात अगोदरच कमतरता होती. गेल्यावर्षी पावसाने ऑक्टोबर महिन्यात हजेरी लावली होती. त्यामुळे मीठाचे उत्पादन घेण्यास मीठागारांमध्ये शेतक-यांना खूप कमी कालावधी उरला.

मीठ उत्पादनात भारताचा क्रमांक तिसरा

दरवर्षी गुजरात राज्यात मीठाचे उत्पादन ऑगस्ट महिन्यांत सुरु होते. जर यंदा मीठाचे उत्पादन घटले तर केंद्र सरकार मीठाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करु शकते. भारत दरवर्षी 3 कोटी टन मीठाचे उत्पादन घेतो. अमेरिका आणि चीन नंतर मीठागारातून मीठ उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. एवढेच नव्हे तर भारत जगातील 55 देशांना मीठाची निर्यात करुन तिथल्या लोकांचे जेवण चविष्ट करतो.

देशातील एकूण मीठ उत्पादनात एकट्या गुजरात राज्याचा वाटा 90 टक्के इतका आहे. म्हणजे देशवासीय गुजरातच्या मीठाचा वापर करुन जेवणाची लज्जत वाढवितात. आता या एकूण मीठ उत्पादनातील 1 कोटी टन मीठाची जगभरात निर्यात करण्यात येते. एक कोटी 25 लाख टन मीठाचे वितरण जगभरात करण्यात येते.

इतर मीठ हे भारतातील किरकोळ बाजारात वितरीत करण्यात येते. फक्त खाण्यापुरताच नाही तर काच, पॉलिस्टर, प्लास्टिक, रसायन आणि अन्य महत्वपूर्ण उद्योगात उत्पादनासाठी करण्यात येतो. त्यावर ही मीठाच्या उत्पादनातील घटीचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.