Tata Memorial : प्रेमातून असे उभे राहिले टाटा मेमोरिअल, रतन टाटा यांच्या आजोबांची अनोखी प्रेम कहाणी

Tata Memorial : जगातील 7 आश्चर्यामध्ये ताजमहल लोकप्रिय आहे. तो प्रेमाची निशाणी म्हणून ओळखल्या जातो. प्रेमाचे प्रतिक म्हणून या वास्तूकडे पाहिले जाते. पण टाटा समूहाचे रतन टाटा यांच्या आजोबांनी पत्नीच्या आठवणीत जी अफाट वास्तू उभी केली आहे ती, सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आज लाखो लोकांच्या आयुष्यात हास्य फुलले आहे.

Tata Memorial : प्रेमातून असे उभे राहिले टाटा मेमोरिअल, रतन टाटा यांच्या आजोबांची अनोखी प्रेम कहाणी
| Updated on: Sep 27, 2023 | 5:19 PM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : मुघल बादशाह शाहजहान याने पत्नी मुमताजच्या आठवणीत ताजमहल बांधला. जगातील 7 आश्चर्यामध्ये ताजमहल लोकप्रिय आहे. जगभरातून लाखो लोक ताजमहल बघण्यासाठी येतात. अनेक जण हा अद्भूत नजारा त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात. पत्नीसोबत अनेक जण येथे सेल्फी काढतात. पण देशात आणखी एक अनोखी प्रेम कहाणी सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचे आजोबा यांची ही लव्ह स्टोरी (Love Story) अनेक जणांना माहिती नाही. त्यांनी पत्नीच्या आठवणीत एक इन्स्टिट्यूट उभी केली. देशातील लाखो लोकांना त्यांचा फायदा होत आहे. असाध्य रोगात त्यांच्या आयुष्यात हास्य फुलले आहे. कोणते आहे हे इन्स्टिट्यूट, कोणाला होत आहे फायदा..

अनोखी प्रेमकथा

दोराबजी टाटा आणि मेहरबाई टाटा यांची ही अनोखी प्रेमकथा आहे. दोघांचे लग्न 14 फेब्रुवारी 1898 रोजी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाले. दोराबजी टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचा मोठा मुलगा. भारताची पहिली ऑलम्पिक टीम परदेशात पाठविण्यासाठी त्यांनी मोठा निधी जमावला होता. त्यावर्षी ऑलम्पिकमध्ये हॉकीत भारताने सुवर्ण पदक पटकावले होते. दोराबजी आणि मेहरबाई टाटा यांची प्रेम कहाणी चर्चेत आली आहे.

मेहर यांनी विक्री केला हिरा

दोराबजी टाटा यांनी लग्नानंतर 2 वर्षानंतर पत्नी मेहरबाई टाटा यांना एक हिरा भेट दिला होता. हा हिरा कोहिनूर पेक्षा जवळपास दुप्पट होता. जुबली डायमंड मेहरबाई त्यांच्या जवळ ठेवत असत. जमशेदजी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाची जबाबदारी दोराबजी टाटा यांच्याकडे आली. टाटा स्टील ही कंपनी उभी करण्यात आणि वाढविण्यात त्यांचा मोठा हात होता. दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर 1920 मध्ये टाटा यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. तेव्हा पतीच्या मदतीसाठी मेहरबाई समोर आल्या. त्यांनी त्यांची सर्व दागिने गहाण ठेवली.

लेडी टाटा

मेहरबाई यांची ओळख लेडी टाटा अशी होती. त्यांच्या प्रयत्नांनी देशात बालविवाह विरोधात इंग्रजांना कायदा करावा लागला. त्याला शारदा एक्ट असे नाव देण्यात आले. हा कायदा 1929 साली तयार करण्यात आला. या कायद्यामुळे मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे तर मुलीच्या लग्नाचे वय 14 वर्षे करण्यात आले. याच कायद्यात पुढे सुधारणा होऊन मुलांचे लग्नाचे वय 21 वर्षे आणि मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे करण्यात आले.

टाटा मेमोरिअल

काही वर्षांत टाटा समूहाची आर्थिक स्थिती पूर्ववत झाली. दोराबजी टाटा यांनी पत्नीचे सर्व दागिने बँकेकडून सोडवले. पण या प्रेमासमोर आणखी एक मोठी कसोटी होती. 1931 मध्ये मेहरबाई टाटा यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले. त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे समोर आले. त्याच वर्षी वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. 1931 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर दोराबजी यांनी पत्नीच्या आठवणीत टाटा मेमोरिअलची स्थापना केली.

अनेकांना आधार


पत्नीच्या मृत्यूनंतर दोराबजी टाटा यांनी मेहरबाई यांच्या जुबली डायमंडची विक्री करुन दोराबजी टाटा ट्रस्ट तयार केला. या ट्रस्टने मुंबईत टाटा मेमोरिअल हॉस्पिटल बांधले. याठिकाणी देशातील लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांवर कमी किंमतीत उपचार करण्यात येतात. ही प्रेमाची निशाणी, लाखो लोकांच्या आयुष्यात आशावाद पेरत आहे.