Sugar Export : यंदा भारतातून विक्रमी साखरेची निर्यात; उसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त साखरेची निर्मिती

| Updated on: May 20, 2022 | 9:01 AM

यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने साखरेची निर्यात देखील वाढवण्यात आली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे.

Sugar Export : यंदा भारतातून विक्रमी साखरेची निर्यात; उसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त साखरेची निर्मिती
Follow us on

नवी दिल्ली : भारतातून होणाऱ्या साखर (Sugar) निर्यातीचे प्रमाण यंदा वाढले आहे. अन्न मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये संपत असलेल्या मार्केटिंग वर्षात आतापर्यंत भारतातून तब्बल 75 लाख टन साखरेची निर्यात (Sugar Export) करण्यात आली आहे. देशात साखरेचे मार्केटिंग वर्ष (Marketing year) मागील वर्षाचा ऑक्टोबर महिना तर चालू वर्षाचा सप्टेंबर महिना असे असते. अन्न मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार यंदा विक्रमी साखरेची निर्यात झाली आहे. साखर निर्यातीचे हे प्रमाण वर्ष 2017-18 च्या तुलनेत 15 पटीने अधिक आहे. भारतातून प्रामुख्याने इंडोनेशिया, अफगानिस्तान, श्रीलंका, बंगलादेश, यूएई, मलेशिया आणि अफ्रिका खंडातील काही देशांना साखरेची निर्यात होते. यंदा देशात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून, अतिरिक्त उसाचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. यंदा 35 लाख टन साखर निर्मितीसाठी जेवढा ऊस लागतो तेवढ्या उसापासून इथनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

90 लाख टन साखर निर्यातीचा करार

मंत्रालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार चालू हंगमात देशभरातील कारखान्यांनी 90 लाख टन साखर निर्यातीचा करार केला आहे. त्यापैकी आतापर्यंत 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निर्यातीवर कोणतीही सबसिडी देण्यात आलेली नाही. 2017-18, 2018-19, 2019-20 मध्ये अनुक्रमे 6.2 लाख टन, 38 लाख टन आणि 59.60 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली होती. तर 2020-21 मध्ये जवळपास 70 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली होती. मात्र यंदा साखर निर्यातीने सर्व रेकॉर्ड तोडले असून, आतापर्यंत 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. वर्षाखेर हा आकडा आणखी वाढू शकतो.

इथेनॉल निर्मितीवर भर

गेल्या वर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. ऊस लागवड वाढल्याने साखरेच्या उत्पादनात देखील मोठी वाढ झाली. देशाची गरज भागून लाखो टन साखर निर्यात करण्यात आली आहे. मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न हा केवळ साखर निर्मितीमधून सुटणार नसून त्यासाठी आता केंद्राकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे. चालू वर्षात 35 लाख टन साखरेच्या निर्मितीसाठी जेवढा ऊस लागतो, त्यापासून इथेनॉलची निर्मिती करण्याचे सरकारचे धोरण आहे. याकरता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिसाठी प्रोहोत्साहन देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर

दरम्यान एकीकडे भारतातून होणाऱ्या साखर निर्यातीच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली आहे. आतापर्यंत आपण एकूण 75 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. मात्र यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोडच आली नाही. ऊस शेतातच पडून असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.