एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 15 हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता, एसबीआयसह परदेशी बँकांशी बोलणी सुरु

| Updated on: Oct 11, 2021 | 2:07 PM

Air India Tata | सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे. संबंधित बँका आणि एसबीआयने अद्याप या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 15 हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता, एसबीआयसह परदेशी बँकांशी बोलणी सुरु
एअर इंडिया
Follow us on

नवी दिल्ली: टाटा समूह एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सिंडिकेटेड कर्जाद्वारे 15,000 कोटी रुपयांपर्यंत उभारू शकतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार कर्जाची मॅच्युरिटी तीन वर्षांची असेल आणि व्याजदर 7 टक्के असेल. या प्रस्तावित सिंडिकेटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रमुख बँकर असू शकते. कारण एसबीआयने बोली लावण्यासाठी आवश्यक बँक हमी आधीच दिली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे. संबंधित बँका आणि एसबीआयने अद्याप या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

टाटा सन्सच्या प्रवक्त्याने या प्रकरणी सांगितले की, त्यांना एअर इंडियाच्या बोलीचा विजेता घोषित करण्यात आले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते भारत सरकारसोबत काम करतील. ते म्हणाले की या प्रकरणामध्ये ते पुढील कोणत्याही प्रतिक्रिया देऊ शकतील.

एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्सकडून सल्लागार समिती

टाटा सन्स एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वी थोड्या काळासाठी सल्लागार समिती तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. तसेच संचालक मंडळाचे सदस्य, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. ईटीच्या अहवालानुसार, एअर इंडियाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

‘एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल’

तब्बल 18000 कोटी रुपये मोजून अखेर टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी केली आहे. त्यामुळे 68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आली. मात्र, एअर इंडियाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात या कंपनीला रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल, असे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले.

सध्याच्या घडीला एअर इंडियाच्या डोक्यावर तब्बल 15000 कोटींचे कर्ज आहे. याशिवाय, भारतातील हवाई सेवा क्षेत्रात एअर इंडियाला अनेक खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचा गाडा पुन्हा रुळांवर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी देशातील हवाई सेवा क्षेत्राकडून टाटा समूहाला सहकार्य मिळण्याची गरज असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले. टाटा समूहाने एअर इंडियाला 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत टाटा समूह विमान कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडेल आणि सरकारला 2700 कोटी रुपये रोख म्हणून मिळतील.

संबंधित बातम्या

मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?

मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब