Inflation : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात केंद्र सरकारसाठी गुड न्यूज, घाऊक महागाईचा दर सर्वात नीच्चांकी

| Updated on: Dec 14, 2022 | 9:45 PM

Inflation : महागाईच्या आघाडीवर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

Inflation : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात केंद्र सरकारसाठी गुड न्यूज, घाऊक महागाईचा दर सर्वात नीच्चांकी
केंद्र सरकारला दिलासा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई दर कमी झाल्यानंतर आता घाऊक महागाई कमी झाल्याची वार्ता येऊन धडकली आहे. किरकोळ महागाई दर (CPI Inflation) कमी झाला आहे. घाऊक महागाई दरातही (WPI Inflation) घसरण झाली आहे. गेल्या 21 महिन्यातील हा नीच्चांकी दर आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकड्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये घाऊक महागाई दर घसरुन 5.85 टक्क्यांवर आला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये हा दर 8.39 टक्के होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता. तर फेब्रुवारी 2021 मध्ये महागाई दर 4.83 टक्के नोंदविला होता. देशभरात घाऊक महागाई गेल्या 19 महिन्यात दोन आकडी होता. त्यामुळे देशात महागाईचा भडका उडाला होता.

ऑक्टोबर 2022 मध्ये हा दर एक आकडी झाला. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88 टक्क्यांवर आला होता. सोमवारी याविषयीचे आकडे समोर आले. किरकोळ महागाईच्या आघाडीवरही सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. गेल्या 11 महिन्यातील हा नीच्चांकी दर होता.

हे सुद्धा वाचा

अन्नधान्य, इंधन आणि उत्पादित माल यांच्या किंमतीत सातत्याने घसरणीचा अथवा स्थिरतेचा हा परिणाम मानण्यात येत आहे. त्यामुळे घाऊक महागाई कमी झालेली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Commerce and Industry Ministry) बुधवारी याविषयीची माहिती दिली.

नोव्हेंबर 2022 मध्ये खाद्यपदार्थ, धातू, कापड, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कागद आणि कागद उत्पादने यांच्या किंमतीत वर्षभरात घसरण झाली आहे. त्यामुळे घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

नोव्हेंबर 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 1.07 टक्के झाला, गेल्यावर्षी हा दर याच महिन्यात 8.33 टक्के होता. भाजीपाल्याच्या किंमतीत नोव्हेंबर 2022 मध्ये 20.08 टक्क्यांची घसरण झाली. तर ऑक्टोबर महिन्यात हा दर 17.61 टक्के होता. आता इतर आघाडीवर किंमती कमी होण्याची आशा आहे.

घाऊक आणि किरकोळ महागाई कमी झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि पतधोरण समिती आता काय धोरण स्वीकारते, रेपो दरात दोन महिन्यांनी कपात करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. केंद्र सरकारने किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत मर्यादीत ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे.